

कुनो राष्ट्रीय उद्यानात ८ चित्ते दाखल
_दहा पटीने वाढल्या जमिनीच्या किमती_
कुनो, (मध्यप्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातून नामशेष झालेले जंगली चित्ते आज कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले. हे चित्ते नामिबियातून आणले असून हा जगातील पहिला मोठा आंतरखंडीय वन्य मांसभक्षक स्थानांतरण प्रकल्प आहे. हे स्थानांतरण प्रोजेक्ट चीता अंतर्गत भारतात केले जात आहे. या आठ चित्त्यांपैकी पाच मादी आणि तीन नर चित्ता आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी चित्ता मित्र, चित्ता पुनर्वसन व्यवस्थापन गट आणि विद्यार्थ्यांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.
1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. सोडण्यात येणारे चित्ते नामिबियातील आहेत आणि त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या सामंजस्य करारांतर्गत आणण्यात आले आहे. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत हे चित्ते भारतात आणले जात असून हा जगातील पहिला मोठा आंतरखंडीय वन्य मांसभक्षक स्थानांतरण प्रकल्प आहे.
चित्त्यांमुळे भारतातील खुली जंगले आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्था पुनर्संचयित करण्यात मदत होईल. यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यात मदत होईल आणि जलसुरक्षा, कार्बन कमी करणे आणि मातीतील ओलावा जपणे यासारख्या परिसंस्थेच्या सेवा वाढवण्यास मदत होईल. परिणामी समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने हा प्रयत्न पर्यावरण-विकास आणि पर्यावरणीय पर्यटन उपक्रमांद्वारे स्थानिकासाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्यास कारणीभूत ठरेल. दरम्यान, या राष्ट्रीय उद्यान परिसरातील जागेचे दर दहा पटीने वाढले आहेत. हे एक मोठे पर्यटन क्षेत्र होणार असल्यामुळे त्या भागात हाॅटेल व्यावसायिकांसह इतर व्यावासायिक जागा खरेदी करत आहेत. या चित्त्यांमुळे त्या भागातील नागरिकांना रोजगार मिळणार असून त्यांचे जीवनमान सुधारणार आहे.
*पंतप्रधानांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद*
गेल्या काही शतकांमध्ये निसर्गाचे शोषण हे शक्तीचे आणि आधुनिकतेचे प्रतीक मानले जात होते. 1947 मध्ये, जेव्हा देशात फक्त शेवटचे तीन चित्ते उरले होते, तेव्हा त्यांचीही सालच्या जंगलात निर्दयीपणे आणि बेजबाबदारपणे शिकार करण्यात आली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. 1952 मध्ये भारतातून चित्ते नामशेष झाले असले तरी गेल्या सात दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न झाले नाहीत, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
आज जेव्हा जग निसर्ग आणि पर्यावरणाकडे पाहत आहे तेव्हा शाश्वत विकासाबद्दल चर्चा होते. भारतासाठी निसर्ग आणि पर्यावरण, इथले प्राणी आणि पक्षी हे फक्त शाश्वतता आणि सुरक्षा नसून देशाची संवेदनशीलता आणि आध्यात्मिकताही आहे. 21व्या शतकातला भारत संपूर्ण जगाला एक संदेश देत आहे की अर्थशास्त्र आणि परिसंस्था ही संघर्षाची क्षेत्र नव्हेत, पर्यावरणाच्या संरक्षणाने आर्थिक विकास घडवून आणता येतो याचं भारत हे जिवंत उदाहरण असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.