

‘काव्य गगनातील शुक्रतारा..’!; अनिता व्यवहारे
_मंगेश पाडगावकर यांची आज पुण्यतिथी_
धुंद असेल जग उद्या नववर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला..
हो….. जुने वर्ष संपले आणि नविन वर्ष सुरू होणार…. मावळत्याकडे पाठ फिरवली आणि उगवत्या चा उदो उदो करणे ही आपली स्वाभाविक प्रवृत्ती, आणि याच सर्वांग सुंदर वर्णन केल आहे.. “मंगेश पाडगावकरांचा सारख्या काव्य गगनातल्या एका शुक्रताऱ्याने..”.
आपल्या ‘सरणारे वर्ष’ या कवितेत…. हे सरणारी वर्ष मात्र तुमच्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करीत तुम्हाला सांगते आहे..
मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे
मित्र हो सदैव राहो चेहरे तुमचे हासरे
30 डिसेंबर रोजी मंगेश पाडगावकर या जगद्विख्यात कवींची पुण्यतिथी होती…🙏
मराठीतील जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा संवेदनशील कवी 10 मार्च 1929 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे त्यांचा जन्माला आला…
उच्च विद्याविभूषित शिक्षण घेणे आगोदरच वयाच्या चौथ्या वर्षापासून काव्यलेखन आला त्यांनी सुरुवात केली. ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.. त्यानंतर त्यांची लेखणी अव्याहतपणे चालत गेली.
सरस्वती शारदे सावरत अस्तातून लेखणी आकारताना जिप्सी, तुझे गीत गाण्यासाठी, सलाम असे एकापेक्षा एक सरस असे चाळीस काव्यसंग्रह त्यांनी लिहिले….. पुढे वेगवेगळ्या साहित्य प्रकारातही त्यांनी लेखन केले. त्यांच्या लेखनाची सुरुवात जरी प्रेम कवितेतून झाली तरी, पुढे मात्र मुलांसाठी लेखन, राजकीय, सामाजिक समस्या प्रतिबिंबित करणार लेखन त्यांनी केले. म्हणूनच तर “साहित्य अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पद्मभूषण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार” अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.
त्यांना जीवनाची प्रचंड ओढ होती ती त्यांच्या काव्यातून व्यक्त झालेली पाहायला मिळते.
अफाट आकाश हिरवी धरती.
पुनवेची रात सागर भरती
पाचुंची लकेर कुरणांच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी
अखंड नूतन मलाही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री”
असा आत्मसाक्षात्कार त्यांच्या मनाला होतो. त्यांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या काव्यप्रवासात त्यांनी कधी विषयाचे बंधन पाळले नाही.
“सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?
अशा अल्लड काव्य करणाऱ्या मंगेशजींनी आपल्या शब्दांमधून वाचकाला जगण्याचे बळ देणारे नवी उर्मी देणारे काव्य साकारले.
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं सेम असतं”
अशा शब्दातून महाराष्ट्राला प्रेमाची व्याख्या देणारा हा कवी जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा संवेदनशील मनाचा कवी होता..
“पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं.
पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं..
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं..
तुम्हीच ठरवा आता कसं जगायचं”..
असं जीवनाचं तत्त्वज्ञान मांडत असताना आपल्यालाही अंतर्मुख करून जाणारा हा कवी स्वतः मात्र सगळी बंधने झुगारून आयुष्याला स्वीकारणारा होता ‘विचारस्वातंत्र्याचा गौरव’ करणारा होता.
त्यांच्या काव्यातले, गीतातले भाव त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतीत झालेले पाहायला मिळते. त्यामुळे अभ्यासक्रमात जशा त्यांच्या कविता समाविष्ट झाल्यात तसे काही काव्य त्यांचे चित्रपटातील गीत म्हणून आजही अजरामर झालेले पहावयास मिळतात..
लहानपणीच्या सांग सांग भोलानाथ सारख्या कविता
आजही मला आठवतात शाळेतून घरी राहण्याचा बहाना शोधताना या कवितेला प्रत्येकाने अनुभवले त्यांची ही कविता म्हणजे शाळेच्या सुट्टीचा गुरु मंत्र म्हणावा लागेल….
“टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले”
असं पारिजातकाच्या झाडाखाली उभ राहुन लहानपणी आपणही हे गीत नक्कीच गायल असेल..
“दार उघड दार उघड चिऊताई दार उघड. कावळ्याचे डावपेच पक्के असतील..
त्यात तुझ्या घरट्याला धक्के बसतील…
तरीसुद्धा या जगात वावरावच लागतं..
आपणच आपल्याला सावराव लागतं”..
असं या बाल कवितेतुन त्यांनी जीवनाच भावविश्व साकारलं तसं
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..
असं काव्य साकारणारे कवी जेव्हा
‘या जन्मावर या जगण्यावर’ असं म्हणून जगणं हे सुंदर आहे हे सांगून आणि शेवटी तर त्यांची अखेरचे येतील शब्द….
या कवितेतील बोल आज प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात जमा झालेले दिसतात.
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती
अशा या महान कवीला गीतकाराला साहित्य प्रभूला माझे कोटी कोटी प्रणाम…
🙏🙏🙏
सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जिअहमदनगर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह