
निरोप सरत्या वर्षाला..!!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
‘निरोप’ हा शब्द उच्चारताच मन हेलावते. भावनांचा गहिवर आठवणींचा बांध फोडतो. सुखदुःखाचे सडा शिंपण सृजनाच्या पायघड्या घालते. वाईटातून चांगले घडते. मन मनाला समजावते. माणूस महत्वाचा हे सूत्र लक्षात घेऊन काही आठवणी विसरायचा प्रयत्न करतो आणि निरोपाची घटिका समीप येते. येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जाताना थोडे द्यायचे, थोडे घ्यायचे. देणा-याचे हात घ्यायचे हा निश्चय केला की जगणे सोपे होते. अनुभूती वेचताना प्रतिभाशक्ती जागृत होते. चारोळी, कथा, कविता, लेख कोणत्याही स्वरुपात ही अभिव्यक्ती व्यक्त होते. कौतुक आणि प्रोत्साहन ही गरज माणसाला माणूस करते. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद, समाधान मानायला शिकलं की मोठ मोठी संकट आपली गती धीमी करतात. ‘जोरका झटका धीरेसे लगे’ याप्रमाणे काही आघात आपण सहन करतो ते या मुळेच.
गतवर्षी अनेक संकल्प, योजना, उपक्रम यातून प्रेरणा मिळाली. काव्य स्पंदन संस्थेने मला, माझ्यातल्या कवीला, माणसाला घडवले. अनेक नाती लाभली. एकमेकांवर जीवापाड प्रेम करताना रूसवा, राग, लोभ आणि निर्व्याज प्रेम करीत गेलो. अपेक्षा ठेवल्या, अपेक्षा भंगाचे दुःख पचवले. पण कर्म फलाची अपेक्षा न ठेवल्याने जबाबदारी वाढत गेली. नवीन जबाबदारी स्वीकारताना काही चुका झाल्या. चुका निस्तरायला आपल्या माणसांनी दिलेला वेळ , निभावून नेलेले नाते यातून माझ्या सहित प्रत्येकाचे मुखवटे गळून पडले. माणूस माणसाच्या सोबत राहिला आणि ही सोबत कार्य प्रवणता वृद्धीगंत झाली.
कौतुकाची अपेक्षा आणि राग आपल्या जवळच्या माणसावर व्यक्त होते. चुकातून माणूस शिकतो. ही शिकवण सृजनाच्या पायवाटा सुजलाम सुफलाम करते. शब्द, स्वभाव आणि विश्वास आपल्यातला माणूस जिवंत ठेवतात. माणूस जपायला शिकलो, तरच आपण आपली कला त्यातील बारकावे अधिक सखोलपणे शिकू शकतो. चारदोन कौतुकाच्या शब्दांनी किंवा ऑनलाईन स्पर्धात्मक प्रमाणपत्रांनी साहित्यिक घडत नाही. साहित्यिक तेव्हाच घडतो, जेव्हा काय लिहायच नाही हे त्याला उमगलेले असते. आणि काय लिहायचे नाही यासाठी स्पर्धा, उपक्रम यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. स्पर्धेत सहभागी होताना, यश मिळाले नाही; तर परीक्षकांना दोष देण्यापेक्षा आपली चूक आपण शोधण्याचा प्रयत्न केला. तर आपण आपला कला व्यासंग अधिक उत्तम प्रकारे जोपासू शकतो.
जोपर्यंत आपण आपल्या चुका मान्य करीत नाही. तोपर्यंत आपली आकलन शक्ती, प्रतिभा शक्तीला थोपवून धरते. हे थोपवून धरणे घातक ठरू शकते. प्रसिद्धी हव्यास आणि सदोष लेखन कमी करायचे असेल; तर दैनंदिन लेखन व्यासंग अत्यंत गरजेचा आहे. ‘माफ करा’ या शब्दांनी इतरांना दिलेले मोठेपण आपल्यातला कलाकार घडवीत जातो. दुसर्याला दिलेला आनंद, समाधान आपल्याला मोठे करतो हे मोठेपण माणसातला विवेक जागृत ठेवत आणि अशा विवेकी माणसांच्या हृदय कोंदणात निर्माण झालेले साहित्य ही त्याची ओळख बनते. ही ओळख मी सातत्याने जपतो आहे. माणसांचे स्वभाव दोष समजून घेताना कदाचित मी देखील चुकलो असेल; पण ती चूक माफ करताच मी मला सावरू शकलो. मोठेपणा मिळवणे खूप सोपे आहे. पण हा मोठेपणा टिकवून ठेवणे फार अवघड आहे. सतत नवनवीन साहित्य निर्मिती करायची असेल, तर चुकांना निरोप आणि नव्या आव्हानांचा स्वीकार यशोमंदिराची वाट दाखवीत रहातो. या वर्षाला निरोप देताना इतकच म्हणावस वाटत..
निरोप 2022ला देता
कुणीतरी येतं, कुणीतरी जातं
स्वभाव तोच आठवण बदलते
आकडे तेच तिथी वार बदलेला
आठवणींचा ओला श्वास
पानापानावर थांबलेला.. !
शब्दाचं कुटुंब कागदावर सजलेलं
आठवणींच गोकुळ मनामध्ये नटलेलं
भूत, भविष्य, वर्तमान, पानामध्ये सामावलेलं
नवीन वर्ष, नवीन कॅलेंडर, प्रतिक्षेत थांबलेलं
निरोप आणि स्वागताला सदानकदा आसुसलेलं.. !
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा, जि.उस्मानाबाद