
विश्वकल्याणाचे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी कटीबध्द होऊ या; – प्रा. सुरेशनाना जाधव
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: समाजाला शेकडो वर्षांच्या दास्यत्वाच्या मानसिकतेतून मुक्त करून समाजात आत्मविश्वास व आत्मगौरवाची भावना जागी करणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य ख-या अर्थाने स्थापन झाले. यंदा या स्थापनेचे ३५०वे वर्ष सुरू होत आहे. तसेच, हे वर्ष भगवान महावीर यांच्या 2550 वे निर्वाण वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांच्या शिकवणुकीनुसार आचरण
वर्तमान स्थितीत पुन्हा अत्यंत आवश्यक झाले आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तो टाळण्यासाठी योग्य ते प्रयत्न करून अहिंसेच्या या मार्गाने पुढे जाण्यासाठी महावीर यांच्या शिकवणुक मार्गदर्शक ठरणार आहे. तसेच, आर्य समाजाचे संस्थापक महर्षि दयानंद सरस्वती यांचे २०० वे जयंती वर्ष साजरे होत असून ‘वेदांकडे परत चला’ अशी घोषणा करणारे दयानंद सरस्वती यांनी स्वातंत्र्य संग्रामात देशभक्तीची प्रेरणा जागी करणे, जाती निर्मूलन, स्त्री शिक्षण या क्षेत्रात त्यांनी मौलिक व पथदर्शी कार्य केले. याचे स्मरण ठेवून त्यांचे हे जयंती वर्ष साजरे होईल. अशात-हेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून विश्वकल्याणाचे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी रा. स्व.संघ
कटीबध्द आहे. सर्व समाजाने यात सहभाग घेतला तर भारत संपूर्ण विश्वात गौरवस्थान प्राप्त करेल. यादृष्टीने येत्या दोन वर्षात कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेशनाना जाधव यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि. १२ ते १४ मार्च दरम्यान समलखा – पानिपत – येथे झाली. सदरच्या प्रतिनिधी सभेचे प्रयोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील कार्याच्या सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.
भारतीय ईतिहासाचा आढावा घेत ते पुढे म्हणाले, परकीय आक्रमणांच्या संघर्षाच्या काळात भारतीय जनजीवन विस्कळीत झाले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थांवर खोलवर आघात झाले. या कालखंडात स्वधर्म, स्वदेशी आणि स्वराज्य या ‘स्व’च्या त्रिसूत्रीत संपूर्ण समाज बांधला गेला होता. आता स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य संग्रमात योगदान देणा-या सर्व स्वातंत्र्य सेनानींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी स्वराज्याचे सुराज्य करणे हे ध्येय ठेवून संघाने पाच आयामांवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने येत्या काळात सामाजिक परिवर्तनाच्या कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य हे ते पाच आयाम ठरवण्यात आले आहेत. यामध्ये समाजहितैषी लोकांना सोबत घेण्यात येणार असून समरसतेसाठी निरंतर प्रयत्न करणे, हे या कार्य योजनेचे उद्दिष्ट असल्याचे प्रा. जाधव यांनी आवर्जून सांगितले.
पानिपत येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून ३४ संघटनांचे १ हजार ४७४ प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी संघाच्या कार्यस्थितीवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. या सभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशभरात ४२ हजारपेक्षा जास्त शाखा सध्या सुरू आहेत. सन २०२२ या वर्षात देशभरात एकूण ३ हजाराच्यावर संघ शिक्षा वर्ग पार पडले.
या पत्रकार परिपदेत रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील पारीत प्रस्तावाबाबत माहिती देताना सांगितले, ” पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २८ प्राथमिक वर्ग पार पडले.त्यात सहभागी स्वयंसेवकांची संख्या ३,३४१ एवढी आहे. पश्चिम प्रांतात पुणे, नाशिक, कोल्हापूर असे तीन विभाग आहेत. बालांच्या शाखा, महाविद्यालयीन शाखा, तरूण व्यवसायी व प्रौढांच्या शाखा मिळून पुणे महानगरात एकूण २७२ शाखा आहेत.
सेवा कार्य करणा-या १ हजार ७२३ सेवा वस्ती आहेत. संघ स्वयंसेवकांच्या वतीने नित्य सेवा कार्य सुरू आहेत, अशा सेवाकार्याच्या ३४५ वस्ती असल्याचे सांगून
सामाजात सकारात्मक परिवर्तनासाठी सामाजिक समरसता, परिवार प्रबोधन आणि पर्यावरण संरक्षण या गतिविधींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे सांगून डॉ. दबडघाव पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण अनेक क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून समोर येत आहे. भारताच्या सनातन मूल्यांवर आधारित नव संकल्पनांचा जग स्वीकार करत आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पनेवर आधारित विश्वशांती, विश्वबंधुत्व आणि मानव कल्याणासाठी भारत आपली भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे.
सुसंघटित, विजयी आणि समृद्ध राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेत समाजातील सर्व वर्गांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता, सर्वांगीण विकासाच्या संधी, तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण उपयोग व पर्यावरणपूरक विकास, आधुनिकीकरणा या संकल्पनेच्या आधारावर नवी उदाहरणे घडविणे यांसारखी आव्हाने समजून घेत आहे. कुटुंब संस्थेचे बळकटीकरण, समरसतेवर आधारीत समाजाची निर्मिती तसेच स्वदेशी भावनेने उद्योजकतेचा विकास इत्यादी उद्दीष्ट्य गाठण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. या दृष्टीने समाजातील सर्व घटकांनी, विशेषतः युवा वर्गाने या कार्यात सहभागी व्हावे. पारतंत्र्याच्या काळात परकीय सत्तेपासून मुक्ती मिळविण्यासाठी ज्या प्रकारे त्याग आणि बलिदानाची आवश्यकता होती, त्याच प्रकारे वर्तमान काळात हे लक्ष्य गाठण्यासाठी नागरिक कर्तव्यांप्रती कटिबद्ध होणे आवश्यक आहे. भारताला विरोध करणाऱ्या बाहेरील अनेक शक्ती कार्यरत असून त्याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. जेणेकरून भारत जागतिक पातळीवर समर्थ, वैभवसंपन्न आणि विश्वकल्याणकारक राष्ट्राच्या स्वरूपात उचित स्थान प्राप्त करू शकेल, असा विश्वास व्यक्त करून अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा समारोप झाला.