‘लेखणी सावरकरांची’; सावरकरांच्या समग्र साहित्याचा मागोवा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा पर्यटन महामंडळ विभाग व विवेक व्यासपीठ यांच्या सहकार्याने ‘संस्कार भारती पुणे महानगर’ यांच्या वतीने सावरकरांच्या साहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. सावरकरांचे अष्टपैलू आणि प्रज्ञावंत व्यक्तीमत्वं त्यांच्या विपुल साहित्यातून प्रभावी रीतीने प्रकट झालेले आहे, त्याचा पुनःप्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोत्यांनी अनुभवला.
शिवाजी महाराजांच्या आरतीसह देशप्रेमाच्या अनेक कविता, भारूडं, पोवाडे, कवनं, दीर्घकाव्य आणि नाटकं अशा सर्व साहित्य प्रकारात सहजपणे मुशाफिरी करणारी सावरकरांची लेखणी राष्ट्रप्रेमा चा ध्यास जागवणारी आहे. म्हणूनच आजही हे साहित्य तरूणांच्या मनात राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य अभिमान जागा करण्यास हे अभिवाचन समर्थ ठरले.
या कार्यक्रमाला सौ.माधुरी सहस्त्रबुद्धे, सावरकर अभ्यासक श्री. पिंपळखरे, संस्कार भारतीचे उपाध्यक्ष श्री. भावार्थ देखणे, प.प्रांत पदाधिकारी श्री. मिलिंद भोळे, अभिनेते श्री.अरूण पटवर्धन इत्यादी मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ‘वीरभूमी परिक्रमा सप्ताह’ अंतर्गत “मी येसूवहिनी- एक सांगीतिक अभिवाचन” हा सावरकरांच्या आदरणीय येसूवहिनी यांचे भावपूर्ण मनोगत ‘समिधा’ पुणे यांनी सांगीतिक अभिवाचन स्वरूपात सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. स्वा.सावरकरांच्या जाज्ज्वल्य देशभक्ती बद्दल अगणित लोकांच्या मनांमध्ये कमालीचा आदर, अभिमान आणि निष्ठा आहे. मात्र स्वतः सावरकरांना कोणाबद्दल आदर वाटत होता, त्यांचे स्फूर्ती स्थान कोण? या प्रश्नांचे उत्तर देणारा असा हा कार्यक्रम सेवासदन शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात तात्याराव आणि त्यांच्या मातृतुल्य येसूवहिनी या दीर भावजयीच्या पवित्र नात्याचे हळवे भावबंध उलगडून दाखविणारा ठरला. या सादरीकरणास सावरकरप्रेमी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.