
‘शौर्य किल्ला’ प्रतापगड
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून २१ किमी. अंतरावर असलेला, पर्यटकांना आकर्षित करणारा ‘शौर्य किल्ला’ म्हणजे प्रतापगड. दरवर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन साजरा केला जातो. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली व मोरोपंत पिंगळे यांना सांगून तेथील भोरप्या डोंगरावर १६५६ ते १६५८ या काळात किल्ला बांधून घेतला. सुरूवातीला या किल्ल्याचे नाव भोरप्या किंवा ढोरप्या असेच होते. अफजलखानाच्या वधानंतर या किल्ल्याला ‘प्रतापगड’ हे नाव पडले.
किल्ल्याची उंची ३५५६ फूट इतकी आहे. गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्याला ४५०-५०० पाय-या आहेत. १४०० फूट लांबी व ४०० फूट रूंदीचा विस्तार आहे.
दक्षिणेकडील टेहळणी बुरूजाखालून पायवाटेने चालत गेले की पश्चिमाभिमुख महादरवाजा लागतो. हा दरवाजा आजही शिवकालीन प्रथेप्रमाणे सूर्योदयापूर्वी उघडला जातो व सूर्यास्तानंतर बंद केला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजवीकडे चिलखती बुरुज लागतो. चिलखती बुरुज पाहून पाय-यांनी भवानी मंदिरात पोहोचता येते. मंदिरात शिवरायांनी नेपाळहून गंडकी नदीतून आणलेल्या शाळीग्रामातून तयार केलेली भवानी मातेची प्रसन्न मूर्ती आहे. मंदिराला लागूनच शिवलिंग व हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिरापासून बालेकिल्ल्याकडे जाते असताना समर्थांनी स्थापन केलेली हनुमान मूर्ती आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडले की केदारेश्वराचे मंदिरात भव्य शिवलिंग आहे. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याचे अवशेष आहेत.
उजवीकडे बगिच्याच्या मधोमध शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. इ.स. १९५७ मध्ये पंडित नेहरूंनी या पुतळ्याचे उद्घाटन केले. या पुतळ्याच्या जागेवरच पूर्वी महाराजांचा राहता वाडा होता. किल्ल्याला राजपहा-याचा दिंडी दरवाजा आहे. जवळच रेडका बुरुज, त्यापुढे यशवंत व सूर्य बुरुज आहेत. बुरूजावरून मोठमोठे पर्वत दिसतात. बालेकिल्ल्याच्या ईशान्येस दोन तळी आहेत येथून कोयना खो-याचेही सुंदर दर्शन होते. गडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे. प्रतापगडावर जाण्यासाठी महाबळेश्वर हे जवळचे ठिकाण आहे. येथून सिटी बसने किंवा स्वत:घ्या खाजगी वाहनाने देखील जाता येते. रेल्वेने आल्यास, सातारा स्थानकावर उतरावे लागेल. सातारापासून ८१ किमी अंतरावर हा किल्ला आहे. सर्वात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे.
स्वाती मराडे, पुणे
सहसंपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’