महाराष्ट्राला सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणा-या मुख्यमंत्र्याची गरज; मुनगंटीवार
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यातील जनतेला सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारा मुख्यमंत्री हवा आहे. मविआमधील सत्ता संघर्षाचा उल्लेख करताना मुनगंटीवार म्हणालेत की “राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांना वाटत आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. तर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना वाटत आहे, की २५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा! मात्र भारतीय जनता पक्षाला आता असे वाटत आहे की ,जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री असावा.
मोहाच्या देशी दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना माजी मंत्री व विरोधी पक्षनेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोमणा मारला “मोहाच्या देशी दारूला आता विदेशी दारू म्हणायचे, असा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या सरकारकडे काहीही न करता त्याचे ‘प्रमोशन’ करायची कला आहे. असे सरकार कुणालाही मुख्यमंत्री म्हणू शकते!
राष्ट्रवादीचा खासदार सुप्रिया सुळें यांनी तुळजाभवानी देवीला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे घातले. त्यावर संजय राऊतांनी, उध्दव ठाकरेच २५ वर्षे मुख्यमंत्री असतील असे म्हटले. याबाबतच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुनगंटीवार म्हणालेत “प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. त्यात काही गैर नाही. आपल्या राज्यात ज्या पक्षाचे केवळ दोन आमदार आहेत त्यांनाही वाटते की आपण मुख्यमंत्री व्हावे! यासाठी काही देवाकडे साकडे घालतात. मात्र, ईश्वराचा अंश असलेली जनता मुख्यमंत्री ठरवत असते. काहींना वाटते की राजभवनात जाऊन शपथ घेण्याचीही गरज नाही! ते एकमेकांना ‘तुम्ही मुख्यमंत्री’ म्हणू शकतात!”