“नोंद नसलेल्या श्रीजी होम्समध्ये उद्धव ठाकरेंची ८९ टक्के भागीदारी”
मुंबई: भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे समोर आणत असतात. त्यातच किरीट सोमय्या यांनी आता ठाकरे परिवारावर निशाणा साधला आहे. मुंबईमधील श्रीजी होम्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के भागीदारी असल्याचे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवाय उद्धव ठाकरे, त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्रीजी होम्स बनवल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
शिवाजी पार्क कॅटेरिंग कॉलेजच्या समोर श्रीजी होम्स कंपनी आहे. मात्र त्याचे मालक कोण, कंपनीत पार्टनर कोण, कंपनीसाठी पैसे कुठून आले असे अनेक प्रश्न काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना विचारले होते. मात्र, त्याची उत्तरे अजून देण्यात आलेली नाहीत. मात्र, दरम्यान किरीट सोमय्या यांनी आज, ५ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन श्रीजी होम्सबद्दल मोठा खुलासा केला आहे. या कंपनीत ८९ टक्के भागीदारी ही उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. या कंपनीची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. यासंबंधीची कागदपत्रे ईडीला दिली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार थांबवायला हवा. सचिन वाझे हे आता माफीचा साक्षीदार बनले आहेत. त्यामुळे अनिल परबांना भीती वाटू लागली आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. परमबीर सिंह यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, सचिन वाझे यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले होते. तसेच सचिन वाझे बोलू लागले तर अडचणी वाढणार असल्याची कल्पना अनिल परबांना असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षीदार झाले तर अनिल परब नक्कीच तुरुंगात जाणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही भीती वाटत आहे की अब मेरा क्या होगा? असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.