मानेवाडा चौकात बेशिस्त वाहनचालकामुळे वाहतुक विस्कळीत
_प्रत्येक सिग्नलवर पोलीस तैनात करण्याची मागणी_
✍️ चेतन कवळते, नागपूर
नागपूर: शहरातील दक्षिण नागपूर परीसरातील मानेवाडा रिंग रोड चौक सदानकदा गजबजलेला चौक म्हणून ओळखले जाते. या चौफुलीतून बेसा, तुकडोजी चौक, दिघोरी ते छत्रपती चौक असा उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम या चारही बाजूकडून वर्दळ सुरू असते. सध्या शहरात मृगसरी बरसण्याची चिन्हे नसून तापमानात अधिकाधिक वाढ होत आहे. सकाळच्या प्रहरी शहरातील चाकरमन्याची धावपळ नित्यनेमाची पण, मानेवाडा चौकात बेशिस्त वाहनचालकामुळे कामावर, कार्यालयात जायला उशीर होत असल्याचे नागरिकांनी आपली व्यथा ‘बिनधास्त’ प्रतिनिधीस बोलून दाखवली.
छत्रपती चौक ते मानेवाडा चौक या मार्गावर प्रत्येक चौकात चार ते पाच सिग्नल असून ते सिग्नल नियमित सुरु असतांना कधी दिसलेच नाही. शहरातील नागरिकांना पडलेली अती घाई ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतांना दररोज पहावयास मिळते. या दरम्यान मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात या बंद सिग्नलचा व वाहतूक नियंत्रण पोलीस नसल्याचा फायदा घेत अनेक वाहनचालक कसेही भरधाव आपली दुचाकी मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.
वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी हे कधी झाडाखाली उभे असलेले दिसतात तर कधी एखाद्या वाहनाची तपासणी करण्यात दंग असतात. बेशिस्त वाहनचालकांना धाक नसल्याने तेही वाहतूक विस्कळीत करण्याचे मुख्य कारण आहे. मानेवाडा ते शताब्दी चौक या दरम्यान नेहमीच रेती, गिट्टी तसेच घर बाधकाम साहित्य पुरविणारे वाहन उभे असतात. त्यांच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा वाढलेला आहे. दररोज चौकाचौकात सकाळी वाहनांच्या मोठ मोठ्या व लांबच लांब रांगा पाहून पोलीस नियंत्रण नसल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे त्रस्त नागरीकांचे म्हणणे आहे.
_त्वरीत वाहतूक नियंत्रक पोलीस तैनात करण्याची मागणी_
दक्षिण नागपूर महानगर पालिका अंतर्गत येत असलेल्या दिघोरी चौक ते छत्रपती टर्मिनस चौक या दरम्यान प्रत्येक सिग्नलवर वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी त्वरीत तैनात करावे अशी मागणी या परिसरात रहाणा-या प्रणाली शेंदूर, शोभीत घोरमाडे, संदीम मसराम, लोकेश सयाम, प्रेरणा डोंगरे, पियुष मेश्राम व चेतन कवळते या चाकरमान्यांनी केली आहे.