एन. व्ही. चिन्मय विद्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
प्रमोद गाडगे
शेगांव: शुक्लपक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांना मानवंदना दिली जाते. चारही वेदांवर प्रभुत्व असणाऱ्या व्यास ऋषींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आणि शांती नांदते. गुरु ती शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते व स्वतःच्या शक्तीने या ध्यानाच्या तपाला शिष्याच्या स्तरावर आणू शकते. एन. व्ही. चिन्मय विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करताना सुरुवातीला गुरुदेव स्वामी चिन्मयानंदांच्या प्रतिमेला हर अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अष्टोत्तर शतनामावलीचे पठण केले.
श्रेया मोहता आणि निशिका लड्डा या दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुचे स्थान मानवी जीवनात उच्च दर्जाचे आहे आणि समाज घडविण्यामध्ये गुरुचा मोलाचा वाटा आहे अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर विद्यालयाचे सीओओ श्री अनिल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते तसेच स्वामी चिन्मयानंद या गुरूंच्या जीवनावर माहिती दिली.
प्राचार्य श्री किशोर कुलकर्णी यांनी “श्रद्धावान लाभते ज्ञानं” या ओळीतून असे सांगितले की, गुरुवर जर आपला दृढ विश्वास आणि श्रद्धा असेल तर विद्यार्थ्याला योग्य ज्ञान प्राप्ती होते हे पटवून दिले. याचबरोबर प्राचार्यांनी एक कथा सांगितली. महाभारतातील कर्ण याने ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपले गुरु परशुराम यांना खोटे सांगितले व गुरु परशुराम यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतले.
अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्ण आपल्या गुरु सोबत खोटे बोलला पण त्याचा उद्देश्य चांगला, ज्ञान प्राप्तीसाठी होता. या उलट आजच्या काळातील बरेचसे विद्यार्थी हे आपल्या पालकांसोबत अभ्यासासाठी मोबाईलचा हट्ट धरतात. परंतु हे विद्यार्थी मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी न करता गेम आणि मनोरंजनासाठी करतात. असे वागताना ते आपल्या पालकांना तर फसवत आहेतच पण स्वतःची देखील फसवणूक करून आपल्या भविष्याचे नुकसान करीत आहेत. असे प्राचार्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकावर दृढ श्रद्धा विश्वास ठेवून चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. असे सुद्धा सांगितले.
त्यानंतर वर्ग एक ते तीनच्या विद्यार्थ्यांना स्वामी चिन्मयानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. शेवटी गुरूंचे भजन गाण्यात आले आणि गुरूंची आरती करण्यात आली.
आदी गुरुसी वंदावेI मग साधनं साधावेI
गुरु म्हणजे माय बापI नाम घेता हरतील पापII
गुरु म्हणजे आहे काशीI साती तीर्थ तया पाशीI
तुका म्हणे ऐसे गुरुI चरण त्यांचे हृदयी धरूII