मानवी शरीर सोसणार नाही इतक्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा भारताला धोका
पल्लवी पाटील, संपादक
नागपूर: उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानाचे आकडे चिंता वाढवणारे असतात. पण यंदाचा उन्हाळा सगळ्यांचीच सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे. कारण येत्या काही काळात मानवी क्षमतांची कसोटी पहाणाऱ्या उष्णतेच्या लाटा भारताला धडकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
आता हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे वर्ल्ड बँकेचा नुकताच आलेला रिपोर्ट. ‘हवामान बदलामुळे भारतीय कूलिंग सेक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या संधी’ हे टायटल असलेल्या रिपोर्टमध्ये भारतात येणार असलेल्या आगामी उष्णतेच्या लाटेबाबत नमूद केलं आहे.
2022 च्या एप्रिल मध्ये दिल्लीने होरपळायला लावणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेतला होता. अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच मार्चमध्ये दिल्लीच तापमान जवळपास 46 से अंशांपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. यावेळी येणारी उष्णतेची लाट मानवी सहनशक्तीची मर्यादा पाहणारी असेल असं या रिपोर्टवरुन समोर येत आहे.