‘मन जपतांना’ भावनिक होऊन चालत नाही
_समजून घेऊया ना एक दुसऱ्याला._
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
खरं तर तिची मनापासून इच्छाच नव्हती, त्या बारशाला जाण्याची. पण सासूबाईंचा रागाचा चढता पारा, आदळ आपट याचा अंदाज घेऊन तिने कशीबशी तयारी केली. शेजारीपाजारी असलेल्या बायकांसोबत नाखुशीनेच निघाली ती. तिथे पोहचल्यावर पाहिलं, खूप गर्दी होती. सुंदर सजावट, आनंदी वातावरण, सजलेला पाळणा, पाहुण्यांची रेलचेल सर्व पाहून मनोमनी सुखावली ती. बाळाला सर्वजण घेत होते. तिची वेळ आली आणि नणंद बाईंनी नकळत ते बाळ तिच्याजवळ न देता स्वतःच घेतलं आणि म्हटलं, ‘राहू दे वहिनी’. पहाड कोसळल्यागत भास झाला तिला अन् एका कोपऱ्यात जाऊन अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तिला भूतकाळ आठवला. पंधरा वर्षे झाली होती लग्नाला, सर्व काही उपाय करून ती थकली होती. खरं कारण त्या दोघांनाच माहीत होतो तिला अन् नवऱ्याला. तिच्यामध्ये दोष नव्हताच मुळी कसलाही. पण तिचं ‘मन जपतांना’ कुणालाही काहीही पर्वा नव्हती. ‘वांझ’ म्हणून बसलेला खोटा शिक्का घेऊनच ती जगत होती. मनाला होणाऱ्या यातना असाह्यपणे भोगत होती, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो अगदी तशीच.
स्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता. स्री अनेक अडथळ्यांवर मात करणारी रणरागिणी. स्री विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती. स्री नव सामर्थ्याची खरी ढाल आणि तलवार. स्री कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाला. स्री अनेकांच्या अंधारमय जीवनातील सोनेरी उजाळा. खरंतर भारतीय स्त्री म्हणजे कुटुंबवत्सल. ती पती आणि पुत्र यांचे मन जपतांना त्यांनाच आपल्या आयुष्याची पूर्व पश्चिम क्षितिजे मानते. तिला तिसरी दिशा माहीतच नसते. तेच तिच्या भाग्याचे दोन ध्रुव असतात. पतीची मर्जी राखण्यासाठी पक्षाचे पर लावून सदैव त्याच्याभोवती भिरभिरत राहते. नवनवसाच्या बाळाचे जरा काही दुखले, खुपले की, जळत्या विस्तवावर चालण्याची तयारी तिची. यातच जीवनाची अवघी इतिकर्तव्यता ती मानते.
पण कोण? कोण जपतं तिच्या मनाला?? ती उपभोगाची वस्तू अशी पारंपारिक प्रतिगामी मानसिकता घेऊन तिच्यावर शारीरिक, मानसिक अत्याचार तर नित्याचेच. मग नशिबाला कंटाळून कधी फास तर कधी विष. कधी ज्वाला तर कधी पाण्याची धारा. तेच तिला जवळच वाटतं आम्हा जिवंत लोकांपेक्षा. हे अपयश नाही का? आणि आहे तर कुणाचं ?? तुमचं? माझं? समाजाचं की समाजातील विकृतीचं?
असे म्हणतात की, शब्दात खूप मोठे सामर्थ्य असतं, पण स्रीमन जपतांना हेच शब्द अशा पद्धतीने वापरले जातात, की तिचं काळीज चिरलं जातं. कोविडचा काळ आठवला की मन सुन्न होतं. मी मी म्हणणारे सरळ दवाखान्यातून स्मशानभूमीत. काय घेऊन जायचं आहे सोबत?? कशाला हवी असूया, मन जपतांना होऊया ना जरा मोठ्या मनाचे. दुसऱ्याचे कौतुक करायला शिकूया. भावाने बहिणीचं मन जपतांना तिला ताई म्हटलं तर काय बिघडलं?? पतीने, पत्नीचे मन जपतांना तिला जरा समजून घेतलं तर काय बिघडलं?? सुनेचे मन जपतांना तिला मुलगी म्हणून प्रेम केलं तर काय बिघडलं?? मैत्रीत एकीने लहानपणा घेतला तर काय बिघडलं?? समाजात आपण पाहतो काहींचं नेहमीच आपलं खेकसणं, दुसऱ्यावर ओरडणं, लहान लहान गोष्टीवरून रागावणं, सतत किरकिर करत राहणं, आकांडतांडव माजवणं हे सर्व ‘मन जपतांना’चे अडथळे तर नाहीत ना??? यावर मात करता आली पाहिजे.
समजून घेऊया ना एक दुसऱ्याला. कारण मन खूप नाजूक आहे. मन कुणाचही असो, फक्त त्यातील भावना समजून घेता आल्या पाहिजे आणि कोण म्हणतं की फक्त आपल्यालाच मन असते? पशु, पक्षी, प्राणी, वृक्ष, निसर्ग यांनाही मन असतं. मनाचा प्रत्येक कोपरा शोधून भावनांचा स्पर्श जर मनाला केला; तर खऱ्या अर्थाने दुसऱ्याच्या मनात शिरता येते. मनात शिरण्याचा मार्ग कधीही शॉर्टकट नसेल, भले लांबचा प्रवास असू शकतो. परंतु त्या प्रवासात कुठलाही धोका नसतो.आपणही भावूक होवून चालत नाही. कारण मन मनातच गुंतलेलं असतं. आणि मनाला गरज असते ती नशिबाच्या साथीची. अन् अशा या मनाला जपतांना अर्थात ‘मन जपतांना’ हा विषय आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी दिला आणि सर्व सारस्वतांना लिहिण्यासाठी मोठं व्यासपीठ मिळालं. परीक्षणार्थ रचना वाचतांना मनाला खूप समाधान मिळालं. कारण आपण सर्वांनी विषयाला अनुसरून, प्रतिभाशक्तीचा वापर करून सुंदर रचनांनी समूह सजवलेत. तेव्हा तुम्हा सर्व ‘काव्य रसिकांचे’ मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यप्रवासासाठी अनंत शुभेच्छा.
शेवटी मी एवढेच म्हणेन, ‘मन जपतांना’ आपणही एकमेकास जपूया, आपल्या सर्वांमधले दैवी नातं सांभाळू या, वाढवूया, वृद्धींगत करूया, एकमेकास मनमुरादपणे दाद देऊया, प्रोत्साहित करूया आणि साहित्य प्रवासात नवं काहीतरी घडवण्याचा संकल्प करूया…!!
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, समीक्षक, कवयित्री, लेखिका, कार्यकारी संपादक