अफलातून जग हे व्यक्ती आणि वल्लीचे….!;वैशाली अंड्रस्कर
*अवलियाच तो… आमच्या विसापूर या गावी आम्ही लहान असताना अचानक एक दिवस तो गावात आला. ना ओळखीचा ना पाळखीचा…ना त्याला गावकऱ्यांची भाषा समजत होती आणि त्याची भाषा गावकऱ्यांना. त्याला काहीही विचारले तर तो फक्त येसय्या एवढेच म्हणायचा…. म्हणून सारेजण त्याला येसय्या म्हणूनच हाक मारायचे. बाकी हातवाऱ्यांवरच चालायचे. एका बऱ्यापैकी श्रीमंत व्यक्तीने त्यास आश्रय दिला. अंगणात झाडझूड कर तर कधी लाकडे फोड अशी घरातील पडेल ती कामे करून दोन वेळच्या जेवणाची सोय झाली. असा अफलातून अवलिया एक दिवस अचानक गावातून नाहिसा झाला. कुठून आला कुठे गेला कुणालाही थांगपत्ता नाही.*
*वर नमूद केलेल्या अनुभवातील व्यक्तींना सामान्यपणे अफलातून असे संबोधतात. ज्येष्ठ लेखक कथाकार पु. ल. देशपांडे यांनी तर ‘व्यक्ती आणि वल्ली’ या कथासंग्रहात अशा तब्बल अठरा वेगवेगळ्या वल्लींची सुरेख मांडणी केलेली आहे. कधी मनात चीड निर्माण करणाऱ्या तर कधी डोळ्यांत आसवे आणणाऱ्या प्रत्येक वल्लींची कहाणीच वेगळी.*
*खरेतर अफलातून हा शब्द ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोच्या अरबी नावातून आलेला आहे. आपल्या मराठी भाषेने हिंदी, उर्दू, फारसी, इंग्रजी अशा विविध भाषांतील शब्दांना आपलेसे केले आणि ते आपल्या जिभेवर एवढे रूळले की, ते आपल्याला परके वाटतच नाही. हीच आपल्या मराठीची गंमत आहे आणि म्हणूनच ती कालानुरूप प्रवाही होत राहिली आहे.*
*नुकतेच महाराष्ट्र शासनाने ‘अद्ययावत मराठी भाषा धोरण’ जाहीर केल्याची बातमी आपण बिनधास्त चॅनलला वाचलेली आहे. एकूणात काय मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी आणि संवर्धनासाठी जे कार्य मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर अव्याहत करीत आहे त्याच दिशेने पडलेले शासनाचे पाऊल आहे. अभिजात मराठी भाषेचा दर्जा याही मागणीचा पाठपुरावा तर सतत चालूच आहे. तो यशस्वी व्हावा मायमराठीच्या वैभवाला सरकार दरबारी सुवर्णझळाळी लाभावी हीच मनोकामना….!*
*शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य प्रशासक माननीय राहुल पाटील यांनी ‘अफलातून’ हा विषय दिला. सुरुवातीला मनात असंख्य विचार आले. स्मृती मधल्या अनेक अफलातून गोष्टी, माणसे नजरेसमोरून तरळून गेली. त्यात काही येसय्या सारखी मनाला स्पर्शून जाणारी, काही डोक्याला ताप देणारी तर काही समाजासाठी, देशासाठी भव्यदिव्य करून जाणाऱ्या संशोधक, शास्त्रज्ञ, समाजसेवक, विविध कलाक्षेत्रातील व्यक्ती अशा एक ना अनेक अफलातून व्यक्तींना मन आठवत गेले. शिलेदारांनी पण अशा अफलातून व्यक्तींना आपापल्या रचनांमधून सुरेख रंगवले. अफलातून हा शब्दच असा की, कधी तो अवखळ प्रेयसीलाही प्रतिबिंबित करतो तर कधी उच्च कोटीच्या कर्तव्यालाही दर्शवितो. अशा शब्दावर लिहावे तितके कमीच…. म्हणून परीक्षकीय लेखणी इथेच थांबवते. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा…!*
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*