शालेय वाहतूक आणि समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे; राजेंद्रसिंग चव्हाण
_शालेय विद्यार्थी बस वाहतूकदार कल्याणकारी संस्थेचा मागणीसाठी पुढाकार_
नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात विविध समस्यांचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून, यातून शालेय विद्यार्थी बस वाहतूकदारांच्या समस्या मागील दोन वर्षापासून प्रलंबित असून याकडे प्रशासन हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक कोरोना काळामुळे बंद होती, आताअडीच वर्षानंतर पूर्ववत सुरुवात झाली आहे. या व्यवसायात अनेक समस्या शासनाधिन आहेत. या समस्येवर शासनाने आवर्जून लक्ष देवून शाळेकरी वाहतूक सोयीस्कर करण्यात प्रकर्षाने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे शालेय विद्यार्थी बस वाहतूकदार कल्याणकारी संस्था आणि भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडी नागपूर तर्फे आयोजित पत्रपरीषदेत राजेंद्रसिंग चव्हाण यांनी व्यक्त केले.
शहरात काही स्कुल व्हॅनचे अपघात झाले असून त्यामध्ये फक्त स्कुल व्हॅन बस चालकांना गृहित धरण्यापेक्षा शासनाने त्या अपघातामागील मुळ कारण शोधणे गरजेचे आहे. उदा. अनेक शाळेमध्ये जाण्यासाठी रोड खड्डेयुक्त असल्यामुळे आणि लहान रोड असून त्यामध्ये वाहतुक जास्त प्रमाणात होत असते. यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. क्षमतेपेक्षा जास्ती विद्यार्थी वाहून नेणाऱ्या वाहनावर व वाहन चालकांवर रितसर कारवाई होणे गरजेचे आहे. सोबतच खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येते. त्यावर प्रशासनाने व वाहतुक शाखेने कारवाई करुन त्या वाहनांना रितसर परवाना देणे गरजेचे असल्याचेही चव्हाण म्हणाले.
कोरोना कालावधीमुळे सर्व स्कुल व्हॅन वाहन चालक आर्थिक अडचणीत आलेले आहे. त्या कारणाने त्यांना वाहन पासिंग करण्याकरीता आर्थिक तडजोड करावी लागते. यावर शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करुन सध्या होत असलेल्या कारवाईवर थोडी शिथीलता आणून वाहन चालकांना काही दिवसांचा कालावधी देणे गरजेचे आहे. वाहतुक शाखेच्या नियमानुसार प्रत्येक स्कूल व्हॅन बस चालकाला शाळेसोबत करारनामा करणे गरजेचे आहे. परंतु अनेक शाळा करारनामा करण्यास उदासिनता दर्शवित आहे. त्यावर शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक शाळा संचालकांना त्याची माहिती व सक्ती करणे गरजेचे आहे.
शासनाने प्रत्येक स्कुल बस व्हॅन चालकाला आर्थिक मदत (कर्ज रुपाने) देण्यात यावी जेणेकरुन त्यांना आपला व्यवसाय व्यवस्थितपणे करता येईल आणि वाहनाचे आर.टी.ओ. नियमानुसार पासिंग करण्यास सोयीस्कर होईल. अशीही मागणी पत्रपरीषदेत करण्यात आली. त्याचप्रमाणे शासनाने प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा ठराविक कालावधीकरीता निश्चित केली आहे. परंतु कोरोना कालावधीमध्ये किमान २ वर्षे सर्व वाहन बंद होते. त्यामुळे शासनाने त्या वाहनाची वयोमर्यादा किमान ५ वर्षे वाढवून देण्यात यावी. अतिरिक्त वाहन क्षमतेवर ज्याप्रमाणे वाहन चालकास दोषी ठरविण्यात येते त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाने वाहनातील आसन क्षमतेपेक्षा जास्ती विद्यार्थी पाठवू नये व व्हॅन चालकास आणि शासकीय नियमास सहकार्य करावे. अशा विविध मागण्या शालेय विद्यार्थी बस वाहतूकदार कल्याणकारी संस्था आणि भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडी नागपूर तर्फे राजेंद्रसिंग चव्हाण यांनी मांडल्या आहेत.