चमचाभर जिंदगीतली डावभर खुशी…!
✍️वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर
*तुझी माझी जोडी*
*जशी कप अन् बशी*
*चमचाभर जिंदगीत*
*वाटून घेऊ डावभर खुशी*
जिंदगी… आयुष्य…एक पाण्याचा बुडबुडा…नियतीने खेळवलेला खुळखुळा…पण याच खुळखुळ्यातून नादस्वर ऐकायचे असतील तर कपबशीचा आदर्श घ्यावाच लागेल….एकाने लवंडल तर दुसऱ्याने सावरलं पाहिजे…दुसऱ्याने सावरल्याचा पहिल्याला अभिमान पाहिजे…काय खरंय ना ?
जिंदगी आणि तीही चमचाभर…होय चमचाभरच… आईच्या उदरातून पहिला वहिला श्वास घेतल्यापासून सुरू झालेला जिंदगीचा एकामागून एक अंक कसा संपत जातो कळतच नाही. जिंदगी नावाचं नाटक उत्तरार्धात येते…मागे वळून पाहताना जाहलेल्या चुका…जगण्याचे राहून गेलेले क्षण… पुन्हा पुन्हा आठवून मन वेडेपिसे होते. तेव्हा असं केलं असतं तर…तसं केलं असतं तर….या भोवऱ्यात मन गरगरा फिरत राहतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही. या भोवऱ्याला विचारांच्या कासऱ्यांनी काबूत आणू या. उरलेल्या क्षणांना भरभरून जगू या. जगता जगता नाही सूर्य होता आलं तरी झगमगणाऱ्या काजव्यांचा प्रकाश होऊ या.
कप-बशी आणि माणूस उर्जेचं नातं…. वाफाळलेल्या चहाचा घोट घेताना सूर कें पिओ…ची मजा देणारा. हीच उर्जा एखाद्या सत्कर्मात लागली तर एखाद्याची चमचाभर जिंदगी उजळून टाकेल. अवतीभवती सूर्यप्रकाशातही दुःखाचा घोर अंधार दिसतो….देऊ या ना त्यांना जराशी तिरीप मदतीच्या उजेडाची. पुसू या ना आसवे एखाद्या हळव्या मनाची…काय मोबदला मिळेल…काय फायदा होईल आपल्याला…याचा विचार जरा दूर सारा…कारण मोगऱ्याला काय मिळतं सुगंध पसरून…सूर्याला काय मिळतं प्रकाश फाकून…झऱ्याला काय मिळतं झुळझुळ वाहून….आणि वाऱ्याला काय मिळतं निष्प्राणात प्राण ओतून….मग आपण एवढं तर करू शकतो ना…एखाद्याची चमचाभर जिंदगीत डावभर खुशी ओतून…चला तर प्रण करू या…रोज एखाद्या जीवाला आनंदीत करण्याचा…!
शनिवारीयं काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य प्रशासक श्री. राहुल पाटील यांनी दिलेला ‘चमचाभर जिंदगी’ हा विषय मनाच्या खोल गाभाऱ्यात पिंगा घालत होता पण वेळेअभावी परीक्षक लेखणी स्तब्ध होती. आज परत उचल खाल्ली विषयाने आणि मनातले भाव लेखणीबद्ध झाले.
स्पर्धेच्या निमित्ताने सर्व शिलेदारांनी विषयास यथोचित न्याय दिला आणि चमचाभर जिंदगीत डावभर खुशी भरून गेली. सर्वांचे खूप खूप अभिनंदन…पुनःश्च भेटू पुढील परीक्षक लेखणीसह…तोवर नमस्कार…!
वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका/ मुख्य परीक्षक
©मराठीचे शिलेदार समूह