राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फटका बसण्याची शक्यता
_राज्यसभा निवडणुकीवरून राजकारण तापलंय_
मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने आता प्रत्यक्ष मतदानातूनच कौल स्पष्ट होणार आहे. अशातच राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पहिला फटका बसण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडी राज्यसभेत भाजपला मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील हे राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटूंबावर सध्या ईडीची देखील टांगती तलवार असल्याने ते भाजपला मतदान करणार असल्याचे समजते.
दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार आणि पालघरकडे वळवले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यातमध्ये चांगलेच सक्रिय झाल्याने बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे. वसई-विरार महानगर पालिका निवडणूकीसाठी देखील शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. याचमुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता 15 तर भाजपला 20 मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष व अपक्ष अशा 29 मतांवर शिवसेना व भाजपची भिस्त असेल. यातूनच ‘घोडेबाजार’ म्हणजेच आमदारांना वश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यातूनच भाजप की शिवसेनेचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होतो वा काँग्रेसला फटका बसतो याची उत्सुकता असेल. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 अशी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची 152 मते आहेत. भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 29 आमदार आहेत.