एकनाथ खडसेंवरील ‘ईडी’ची कारवाई अयोग्य
_रक्षा खडसेंकडून भाजपाला घरचा आहेर_
मुंबई :- मागील काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.भाजप (BJP) सूडबुद्धीने यंत्राच्या गैरवापर करत शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर झालेली ‘ईडी’ची (ED) कारवाई ही अयोग्य असल्याचे त्या म्हणाल्या. जळगाव जिल्हा भाजप कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या ‘ईडी’कडून खडसे कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्ता खाली करण्याच्या नोटीसीबाबत पत्रकारांनी रक्षा खडसे यांना प्रश्न विचारला होता. यावर खडसेंवरील कारवाई ही ‘ईडी’च्या दृष्टीने योग्य असली तरी आमच्या दृष्टीने अयोग्य आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने यावर जास्त बोलणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.
मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त गेल्या आठ वर्षातील जळगावमध्ये राबविलेल्या योजनांची माहिती सांगितली. उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुषमान भारत योजना या योजनांमुळे जनतेला मोठा फायदा झाल्याचे त्या म्हणाल्या. तसेच काश्मिरमधील कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, राममंदिर असे चांगले निर्णय केंद्राने घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.