जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्यात..!
बीड : महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या विधानपरिषद आणि आताच्या राज्यसभा निवडणुकीत जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचा अपेक्षाभंग झाला. परंतु नुकत्याच होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याबाबत त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.
मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे आणि लोकांची इच्छा हीच माझी शक्ती आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, ते पाहावे लागेल. अस सूचक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी आपण जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले होते . त्यामुळे भाजपमध्ये (BJP)एकच गोंधळ माजला होता.
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यांना भाजपमधून योग्य रित्या बाजूला करण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. राजकारणात अनेकदा संधी येते -जाते. मी कुठल्याही संधीसाठी प्रयत्न करत नाही. अपेक्षा करत नाही. माझा तसा स्वभावही नाही. जी संधी मिळेल त्याचे मी सोने करून दाखवते, असे सांगत त्यांनी विधानपरिषदेच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्या बीड येथे भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृती समर्पित कार्यक्रमात बोलत होत्या.
बहुजनांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. असा कुठलाही महाराष्ट्रातला नेता नाही जो गोपीनाथराव यांच्यासाठी इथे आला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीनिहाय जनगणनेसाठी जी भूमिका घेतली आहे. त्याचे स्वागत करते. जातीय जनगणना झाली पाहिजे. ओबीसी आरक्षणासंदर्भात काही मदत लागली तर सरकारने मध्यप्रदेश सरकारची मदत घ्यायला हवी, असे त्या म्हणाल्या.