राष्ट्रवादीची दोन मते धोक्यात; ‘मविआ’च्या डोक्याला ताप
मुंबई :- राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात ६ जागांसाठी ७ उमेदवार उभे असल्याने मतदान होणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरले आहे. पण, राष्ट्रवादीचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक अटकेत असल्याने ते मतदान करू शकतील की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे मविआच्या डोक्याचा ताप वाढल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारी मागे घेण्याची मुदत काल संपली. कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने, रे आज्यसभेची निवडणूक बिनविरोधची २४ वर्षांची परंपरा मोडीत निघाली. विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे.
या निवडणुकीत आता अपक्ष आमदारांचे महत्त्व वाढले असतानाच सर्व पक्षांना त्याच्या पक्षाच्या आमदारांचे एक-एक मत मोलाचे झाले आहे. अशात, राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मत धोक्यात आली आहेत. कारण राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आजी-माजी मंत्री आणि आमदार सध्या तुरुंगात आहेत. या दोघांनाही मतदान करता येणार की नाही याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही.
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या नियम क्रमांक ६२ (५) नुसार जे आमदार तुरुंगात शिक्षा भोगत असतील, किंवा त्यांच्याविरोधातील सुनावणी न्यायप्रविष्ट असेल आणि त्यावेळी ते कारागृहात असतील अथवा संबंधित आमदार पोलिस कोठडीत असताना त्यांना कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मात्र, न्यायालयाने परवानगी दिल्यास मतदान करता येत असल्याचेही काही घटनांमध्ये दिसून आले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी, मलिक आणि देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी राष्ट्रवादी जोमाने कामाला लागाली आहे, मलिक आणि देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी न्यायालयात दाद मागण्याची तयारी करण्यात आली आहे. मागच्या काळातही अशा काही घटना घडलेल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे तत्कालीन आमदार रमेश कदम आणि छगन भुजबळ मतदानासाठी विधीमंडळात आले होते, त्यामुळे मलिक आणि देशमुखांच्या मतदानासाठी आम्ही मोठ्या कसोशीने कामाला लागलो आहोत, असे सांगितले.
याठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे – अजित पवार सांगत असलेली निवडणूक राष्ट्रपतीपदाची होती आणि ती २०१७ मध्ये झाली होती. नंतर, २७ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक आयोगाने नियम अद्ययावत करुन नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. त्यामुळे मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार की नाही याबद्दल कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो.