‘या’ शेतकरी संघटनेत उभी फूट; नितीन बागल यांच्यासह 5 जणांची हकालपट्टी
पंढरपूर – आठ वर्षापूर्वी स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून पंजाबराव पाटील आणि बी.जी पाटील यांनी स्थापन केलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेत उभी फूट पडली आहे. पंढरपूर येथील नितीन बागल यांनी संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत बळीराजा शेतकरी संघटनेची नवी स्थापना केली आहे.
तर पंजाब पाटील व बी.जी पाटील यांनी काल पंढरपुरात येवून फुटीरवादी पदाधिकाऱ्यांची हाकालपट्टी करत बळीराजा शेतकरी संघटना आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दावे प्रतिदाव्यानंतर संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. पंढरपूर येथील नितीन बागल यांनी गेल्याच आठवड्यात बळीराजा शेतकरी संघटनेशी पंजाबराव पाटील आणि बी.जी. पाटील यांचा काही संबंध नाही. आपण स्वतः बळीराजा शेतकरी संघटनेची अधिकृत नोंदणी केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काल बळीराजाचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचा आणि नितीन बागल यांचा काडीचाही संबध राहिला नसल्याचे सांगत त्यांच्यासह उमेश देशमुख, रामदास खराडे,साजिद मुल्ला व रमेश गणगे यांची संघटनेतून हाकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान बळीराजा शेतकरी संघटनेची आम्ही अधिकृत नोंदणी केली आहे. त्यामुळे बळीराजा संघटना ही आमचीच असल्याचा दावा नितीन बागल यांनी केला आहे. त्यामुळे बळीराजा संघटना नेमकी कोणाची याविषयी आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.