श्रावणसरी….आनंदाची झड..!!; सविता पाटील ठाकरे

श्रावणसरी….आनंदाची झड..!!; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पृथ्वीतलावरील सर्वच मानव जातीच्या आयुष्यात वर्षांऋतू हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सर्व ऋतूंमध्ये या चातुर्मासाचा वरवर जरी विचार केला तरी लक्षात येईल की आपल्या जीवनाचा ‘आधार’ आहे हा ऋतू! विशेषत: भारतात तिन्ही ऋतू- म्हणजे वसंत, वर्षां आणि हेमंत- परिपूर्णतेनं आपले पंख पसरवून बाराही मास आपला डोलारा सजवीत नृत्य करीत असतात! सर्व ऋतूंमधील राजा जरी ‘वसंत’ मानला गेला असला तरी ‘वर्षां’ ऋतूचे महत्त्व आणि सर्वाना त्याचे आकर्षण हे केवळ निर्विवाद आहे. अनेकस्वरूपी भावनांचा पिसारा आहे हा ऋतू! मेघांची आळवणी, गरजणारे ढग, आकाश भरून चमकणाऱ्या दामिनी, कोसळणाऱ्या आणि लपंडाव खेळणाऱ्या जलधारा, धरित्रीवर अलगद भुरभुरणारी रिमझिम, विराण्या, श्रावणातला हर्ष आणि शोक.. म्हणजेच ‘श्रावणसरीतील आनंदाची झड’.

या मौसमात लिहतांना कविवर्य बा. भ. बोरकर फार सुंदर रीतीनं व्यक्त होतात..

‘सरींवर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कापति कदंब-िनब!’

श्रावणसरी येऊ लागल्या की घरच्या कुमारिका आणि माहेरी आलेल्या विवाहितांना आंबा, कडूलिंब आणि कदंबाच्या झाडावर बांधलेल्या ‘सावन के झुले’चे आकर्षण नसेल तरच नवल!

अशातच इतर कवितेच्या रांगेत बालकवींच्या या ओळी म्हणजे श्रावणाची खरी अनुभूती….

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे …
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे…

आल्हाददायक निसर्ग आणि हिरवीगार वनराई. झाडं वेलींचे ते प्रफुल्लित हसणं. सकाळ संध्याकाळ आकाशात ढगांची गर्दी. कधी ऊन कधी वारा तर कधी जलधारा. शेतकरी ही जरा विसावलेला…!! उमेद आणि उत्साहाने सुरू झालेले शाळा महाविद्यालय घराघरातून अगरबत्ती ,धूप चा येणारा सुगंध. व्रत, वैकल्य यात रमलेल्या माता भगिनी, सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रम. ऊन सावलीचा खेळ आणि कधीही टप टप पडणारा पाऊस. नदी नाले धरणीची तृप्तता….. मोराचा फुललेला पिसारा आणि थुईथुई नाचणे. निसर्गाचा अनोखा असा हा लपंडाव म्हणून तर आपण म्हणतो ना….

‘हसरा नाचरा जरासा लाजरा…
सुंदर साजिरा श्रावण आला.’

हे सर्व कमी होतं की काय म्हणून आकाशातल्या इंद्रधनुचे सप्तरंग या सौंदर्यात आणखी भर टाकतात.
यात श्रावण म्हटला की सणांची मांदियाळी.. श्रावण सोमवार , नागपंचमी , रक्षाबंधन , मंगळागौर , जन्माष्टमी याने श्रावण जणू चिंब भिजतो. अशा आगळ्या वेगळ्या श्रावणातल्या श्रावणसरी म्हणजे दुधात साखर . आषाढात धो धो कोसळणारा पाऊस जरा सौम्य होतो आणि आम्हा कवीकवयित्रींच्या लेखणीला बहर येतो..

म्हणून तर म्हटलं…..
जे न देखे रवी
ते देखे कवी
आणि मग सुरू होतो काव्य साधनेचा प्रवास. ज्याप्रमाणे चित्रकाराच्या कुंचल्यात वनराई घट्ट बसते, त्याचप्रमाणे आमच्याही लेखणीत सारं काही सामावण्याचा प्रयत्न असतो. हे सर्व लक्षात घेऊन आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘श्रावणसरी’ हा विषय दिला.

श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशमी धारा …
झाडा झाडातून फुलत गेला हिरवा मोर पिसारा..!!

अवलोकनार्थ रचना वाचताना काही रचना खरोखर खूप अप्रतिम होत्या…
जसे.. “श्रावणसरी क्षणात सरसर तृणपात्यावर पडती.’ काहींमध्ये मर्म भाव अनोखा साधलाय. मेघ नभात दाटता येती श्रावणाच्या सरी. तर काहींनी निसर्गातील बदल अचूक टिपले. बरसू दे श्रावणसरी सुख साठे मनात..! बहुतांशी कवींनी श्रावणातील निसर्ग बदल मस्तच रेखाटला. अवखळ चंचल श्रावणसरी तेज झळके तव वदनावरी… अशा एक ना अनेक रचनांनी आजचा श्रावण खऱ्या अर्थाने लेखणीने सजवला. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन…
शेवटी एकच…

अनुभव सिद्ध लिखाण नेहमी आगळे वेगळे असते…त्यात आत्मीयता असते जीव ओतलेला असतो अन्..महत्त्वाचे म्हणजे ते तुम्हास आत्मिक सुख अन् समाधान देते…शब्द भले साधे असुदेत ते अंतकरणाचे बोल असतात..!!

सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles