ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या साहित्याने नव वर्षाचे स्वागत
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: नव्या कॅलेंडर वर्षाचे स्वागत मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकांच्या गौरवान्वीत साहित्याचे अभिवाचन आणि गीत सादरीकरण करून या थोर लेखकांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम उत्कर्ष प्रकाशन आणि अखिल भारतीय साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वि.स.खांडेकरांच्या ‘ययाती’, ‘दोन ध्रुव’, ‘अमृतवेल’ या कादं-यांमधील निवडक उता-यांचे वाचन, कुसुमाग्रज तथा , वि.वा.शिरवाडकर यांच्या ‘विशाखा’ काव्यसंग्रहातील कविता, तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘नटसम्राट’, या नाटकातील प्रवेश, विंदा करंदीकरांचे ‘अष्टदर्शने’ आणि भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ कादंबरी, अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ साहित्यकृतींचे अभिवाचन
या कार्यक्रमात करण्यात आले.
कवी कुसुमाग्रजांचे ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हे गाणे मनिषा सुमंत, सर्वात्मका सर्वेश्वरा हे गीत शैलजा देवस्थळी, ” हे सुंदर किती चांदणे’ हे गाणे स्मीता इंगळगावकर यांनी सादर केले. तसेच, विंदांच्या कविता आरती मोने यांनी सादर केल्या. डाॅ.अनुजा कुलकर्णी यांनी भालचंद्र नेमाडे आणि प्रा. श्याम भुर्के व गीता भुर्के यांनी वि.स.खांडेकर यांच्या साहित्याचे अभिवाचन केले. नववर्षाचा शुभारंभ अशा प्रकारे साहित्यिक कृतीशील उपक्रमाने केल्याबद्दल उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.