माझी चार धाम यात्रा…!!!
दिनांक 20 मे रोजी मावळतीच्या रवीला साक्षी ठेवून,देवघरातील देवांकडे साकडे घालत, थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन, जिथे स्वर्ग ही फिका पडेल अशा मातेच्या चरण कमलांचे दर्शन घेऊन घराचा उंबरठा ओलांडला….
पुणे स्टेशन वरुन संध्याकाळी 6:30 च्या दरम्यान आमचा रेल्वेचा प्रथम दिवसीय प्रवास सुरू झाला… त्यादिवशी रेल्वेला खूप गर्दी असल्यामुळे प्रवास थोडा खडतरच होता. तरी ही मैत्रिणीच्या सोबतीने तो ही आनंदे पार पाडला. दुसऱ्या दिवशी दुपारी मथुरेला उतरायचे व तेथून श्री कृष्ण जन्मभूमी आणि प्रेम मंदिर पहायचे असे नियोजन होते.
परंतु रेल्वे 2…/..3 तास लेट झाली. धावत पळत श्री कृष्ण जन्मभूमी आणि आजूबाजूचे परिसर दर्शन झाले. घाईघाईत जेवणं आटोपून पुन्हा रेल्वे नेच हरिद्वार च्या दिशेने पुढील प्रवास सूरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिद्वार येथे एका हॉटेलवर पोहोचल्यानंतर तेथे चहा नाश्ता करून आम्ही हरिद्वार दर्शनाला निघालो. सृष्टीची कृपा आणि दैवत्व अनुभवायचे असेल तर ते हरिद्वार येथेच. हरिद्वार म्हणजे देवांचे प्रवेशद्वार. महान राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळून देण्यासाठी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आणली. गंगा यमुनेचे उगमस्थान असलेल्या या हरिद्वारात गंगा नदीत स्नान केल्याने पापातून मोक्ष मिळतो म्हणूनच लाखो भाविक इथे प्रती दि न गंगापूजन, गंगा आरती करण्यासाठी येतात … तेच भाग्य आम्हालाही लाभले.
चारधामातलं पहिले धाम यमुनोत्री. या धामाविषयी मनात एक उत्सुकता होती. जवळजवळ सात किलोमीटर चढण रस्ता. एका बाजूला उंच उंच विशाल असे पहाड, चिखलात रुतलेली बिकट वाट,दुसऱ्या बाजूला खोल दरी , यमुनेचा खळखळाट, आणि थोडी वर नजर फिरवली तर जणू बर्फांच्या राशी. जणू इथे आम्ही स्वर्ग अनुभवत होतो. मंदिराकडे जाण्यासाठी घोडा पालखी,पिटू अशी व्यवस्था असते.. पिट्टू, पालखी पसंत नव्हतेच. घोड्यावरून जाण्याचा पर्याय स्वीकारला. ते ही दिव्यच होतं.यमुना नदीचं उगम स्थल. उत्तराखंडातील चारधाम यात्रे पैकी प्रथम धाम यमुनोत्री. या मंदिरात सूर्य पुत्र भगवान यम आणि पुत्री यमुना देवी मूर्तीच्या रूपात विराजमान आहेत… कालिंदी पर्वतातून यमुना वितळते आणि पाण्याच्या रूपात इथे वाहते.
सगळीकडे शांत शितल थंडगार हवा, वरती पाऊस….
पाण्यात लपलेला बर्फ, तर आजूबाजूला गरम पाण्याचे कुंड… या कुंडांपैकी ‘सूर्यकुंड’ हे गरम पाण्याचे कुंड आहे..इथे भाविक स्नान करून यमुनोत्री देवीच्या दर्शनाला जातात. तिथेच अजून एका कुंडावर इतकं उकळतं पाणी की त्यामध्ये कापडात तांदूळ आणि बटाटे बांधून बुडवले की ते सहज शिजून निघतात… तोच नैवद्य देवीला अर्पण केला जातो. पूजा यथासांग पार पाडली. डोळ्यांचे पारणें फिटले होते. मन तृप्त झाले होते, शरीर थकले होते. पण मन आनंदी आणि समाधानी होते. त्यामुळे सहजच निद्रादेवीच्या कुशीत शिरले. दुसरे धाम ‘गंगोत्रीकडे’ जायचे वेध लागले होते. (क्रमश:)
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
=====