
‘मृगजळ’ एक आभास; वृंदा करमरकर
कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे ही आस लागे जीवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला
या गीताप्रमाणे ‘मृगजळ’ एक आभास असतो. जे नसते ते असल्याप्रमाणे वाटणे याचेच नाव मृगजळ. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता प्रकाश किरणांच्या दिशेत उष्ण हवेत होणाऱ्या वक्रीकरणामुळे दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेस मृगजळ म्हणतात. मृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तनाद्वारे तयार होतात आणि मुख्यत: ते वाळवंटात किंवा पाण्याच्या थंड भागांमधून , हवेच्या तपमानात मोठ्या प्रमाणात बदल होण्यामुळे झालेले दिसतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उद्भवणारे अपवर्तन मुख्यत: तापमानातील कमी जास्त प्रमाणाने होते.
वास्तविक जीवन जगता ना अनेक आव्हाने झेलावी लागतात. कधी प्रेमात फसवणूक, यशासाठी प्रयत्न करूनही अपयश पदरी पडते. एखादं स्वप्न जपून त्याच्या प्राप्तीसाठी अहोरात्र झटणं, पण पदरी निराशा येणं अशा परिस्थितीत जे यश, प्रेम स्वप्नवत ठरतं त्याला ते मृगजळ ठरलं असं म्हटलं
जातं.
‘तुझ्या प्रेमासाठी मी वेडी
वळणे आली वेडीवाकडी,
पण तू मृगजळ ठरलास..’
आता तिच्यासाठी त्याचं प्रेम अप्राप्य ठरलं. म्हणूनच ते एक मृगजळच. सध्या संगणक क्रांती झाली. मोबाईलनं सारं जग जवळ आलं. आभासी जगच खरं वाटू लागलं. घरी तरुण पिढीला आई, वडिलांशी बोलायला वेळ मिळेना. नात्यांची घडी विस्कटली. मृगजळामागे धावून काय मिळालं?
‘आभासा मागे लागले
नाती आपली विसरले,
मृगजळच वाटे आपले’
आज आपण बघतोय की, प्रत्येक माणूस धावतोय. कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही. पण ह्या जीवन प्रवासात माणूस काहीतरी गमावत चाललाय असं वाटत नाही का? हे लक्षात कसं येत नाही? जेव्हा लक्षात यायला लागते तेव्हा वेळ निघून गेलेली असते .पोटापुरते तर मिळाले पण अजूनही काहीतरी मिळेल का ह्या आशेने माणूस सारखा मृगजळामागे धावताना दिसतो. मृगजळ म्हणजे काय ? एखादी गोष्ट कायम आहे असा भ्रम व्हायला लागणे, वास्तवात नसणाऱ्या गोष्टीच्या मागे धावायला लागणे , माहीत नसलेल्या गोष्टींच्या मागे पडणे म्हणजे मृगजळ, खरंच माणसाचं समाधान होत नाही. कारण त्याची हाव संपणारी नसते.
‘मृगजळामागे धावता
माणसा भान विसरता,
शेवटी तुझी झोळी रिकामीच’
आंतरिक समाधान हे असावे लागते. नाहीतर नवनवीन इच्छा, आकांक्षा मनात निर्माण होतात. त्यांच्या पूर्ततेसाठी माणूस धावत राहतो. नाती विसरतो. यंत्रवत काम करतो. पण तो हे विसरतो, ज्या सुखामागे तो धावत आहे ते अशाश्वत आहे. त्या शोधाच्या पाठीशी एक मृगजळ ठामपणे उभे आहे. ते मृगजळ हाती लागणारे नसतेच. फक्त भुलवत राहते.
‘किती शोधले तरी तुझा
शोध संपणारा नसतो,
अंताचा मृगजळ पाठीराखा असतो’
अशारीतीने जीवनात असे मृगजळ भुलवते. माणूस आभासामागे धावतो. पण खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी समाधान, तृप्ती ही आतून असावी लागते.सतरच शाश्वत सुखाचा शोध लागतो. आजच्या या त्रिवेणी काव्य स्पर्धेत नेहमी प्रमाणे आदरणीय राहुल सरांनी ‘मृगजळ हा विषय दिला आहे. जीवनाकडे बारकाईने बघावे, काही तरी नवीन शिकावे. हाच उद्देश यामागे आहे. शिलेदारांनी पण प्रतिसाद चांगला दिला आहे. तरी तिसऱ्या ओळीच्या कलाटणीकडे अजून लक्ष देण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने त्रिवेणी काव्याचा आनंद घेता येईल. सर्व शिलेदारांचे मनापासून आभार.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक, सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह