“निखळ हास्याची नितांत गरज’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“लाजून हासणे अन् हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे”
खरंच हास्य ही निसर्गाने आपल्याला बहाल केलेली दैवी देणगी आहे. जो माणूस सदैव हसरा असतो तो सर्वांना हवाहवासा वाटतो. ज्याला सतत हसतमुख रहाता येतं तो
जगमित्र होतो. जगातली सगळ्यात दुर्मिळ आणि स्वस्त गोष्ट हास्य’. हास्य, मन मोकळं करतं. निर्मळ ठेवतं. अशा मनात मग सतत चांगले विचार येत राहतात. प्रसन्नतेकडं झुकणं हे या मागचं महत्वाचं कारण. जे हास्य मनाला सुखावतं, ते अत्यंत कष्टानं मिळवलेलं असतं. अमूल्य असतं, जीवनाशी संघर्ष करून बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या चेहेऱ्यावर येणारं हास्य समाधानाचं असतं. त्या हास्याचं ‘स्मित झालेलं असतं. असंच हास्य शेतकऱ्याच्या चेहेऱ्यावर उमटते, जेव्हा चार महिन्यांची त्याची मेहनत फळते. ते हास्य संपूर्ण कुटुंबाने वाटून घेतलेले असते. त्याचा आविष्कार हा त्या निराकाराचे आभार मानणारा असतो.
‘हास्य’ हे रसनिष्पत्ती प्रधान आहे. अनेक रसांमध्ये ते सामावलेले आहे. शृंगाररसात त्याचा आविष्कार वेगळा तर वीररसात वेगळा. करुण रसात आणि प्रेमरसात निर्माण होणाऱ्या हास्यातही बारीकसा फरक आहे. एकात असहायता आहे तर , दुसऱ्यात आसक्ती. भक्ती रसातील हास्य थेट सगुणाशी वा निर्गुणाशी संबंध प्रस्थापित करणारं. सध्याच्या आभासी जगात माणूस पैशाच्या मागं धावणारा एक यंत्र झाला आणि आपलं हसणं गमावून बसला. रोजच्या ताण तणावात नैसर्गिक हसू तो विसरला. आभासाशी नातं जोडू लागला. चिंताग्रस्त जीवन जगू लागला. त्यामुळं सध्या मानसिक तणाव दूर करण्यासाठी हास्यक्लब सुरु झाले आहेत.
गेले कुठे हास्य तुझे माणसा
पैशामागे तू धावू लागलास
जगणेच विसरून गेलास.
हसण्याचे खूप फायदे आहेत. निखळ हास्याने चेहरा प्रसन्न दिसतो. विचारामध्ये विधायकता येते आणि मन प्रसन्न होते. पचनक्रिया सुधारते, श्वासाची गती नियंत्रित होऊन उच्च व कमी रक्त दाबाच्या आजारात फायदा होतो. क्रोध दूर होतो. करुणा, क्षमा भाव वृद्धिंगत होतो. हसण्यानं तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही आधीपेक्षा जास्त आकर्षक दिसता. तुमचं हास्य तुमच्या मेंदूच्या भागाला ट्रिगर करते जो तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. हसण्याचा संबंध मानवी मन आणि शरीर यांच्या आरोग्याशी आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या निखळ हास्याची नितांत गरज आहे. याच दृष्टीकोनातून आदरणीय राहुल सरांनी ‘हास्य तुझे’ हा विषय काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी दिला आहे. सर्व शिलेदारांनी स्पर्धेत हिरिरीने सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह