जे. एस. एम. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
अलिबाग, विशेष प्रतिनिधी.
तुषार थळे, अलीबाग विशेष प्रतिनिधी.
अलिबाग: जे. एस. एम. व अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवार, दि. ०५ एप्रिल २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील हे उपस्थित होते. तर उपाध्यक्ष मा. डॉ. साक्षी पाटील ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर जे एस एम महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. सोनाली पाटील, अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य. अॅड. नीलम हजारे, डाॅ. संदीप घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य अॅड. नीलम हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सर्व यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा व अविस्मरणीय क्षण असून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वत:च्या व समाजाच्या उत्कर्षासाठी विनियोग करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अॅड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासंबधीची उद्घोषणा केली. यावेळी जे. एस. एम. महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधून तसेच विधी महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, प्राचार्या अॅड. निलम हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली .
यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्याचा संस्मरणीय अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास महाविद्यालायातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी आठवले, पदवी प्रमाणपत्रांचे वाचन प्रा. सुरभी वाणी यांनी केले तर डाॅ. संदीप घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समितीचे प्रमुख प्रा. जयेश म्हात्रे व प्राध्यापक सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ च्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून संबंधित विद्यार्थ्यांनी दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत ती घेऊन जावीत, अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांना आपली पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठात जाऊन घ्यावी लागतील असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.