जलजीवन मिशन ठरला हर घर जलचा कर्दनकाळ
जिल्हा प्रतिनिधी, भंडारा
जवाहरनगर : हर घर नल हर घर जल चा नारा देत मोठा गाजावाजा करत जल जीवन मिशनचे काम सर्वत्र सुरू करण्यात आले. मात्र हे मिशन सर्वत्र अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सावरी ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामात बघायला मिळत आहे.
या योजने अंतर्गत इंदिरानगर सावरी गावांमध्ये मध्ये काम सुरू आहे. यासाठी गावाला १०७.९३ लक्ष रुपयाचा निधि प्राप्त झालेला आहे. मात्र योजनेअंतर्गत झालेल्या कामात वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे दबक्या आवाजात ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. सध्या या योजनेचे ट्रायल रन सुरू आहे.
मात्र नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची बोंबाबोंब सर्वत्र आहे तर अर्ध्याहून अधिक नागरिकांना पाणीच मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जल जीवन मिशन च्या आधी असलेले जुनी जलवाहिनी अंतर्गत सर्वांना मुबलक आणि पुरेसे पाणी उपलब्ध मिळत होते. तरीही केवळ अर्थकारणासाठी ही योजना आणल्या गेली का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. जलजीवन मिशनचे काम सुरू झाल्यानंतर जुन्या जलवाहिनीची तोडफोड करण्यात आली. व गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नागरिकांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अधिकारी व कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे व कामातील तांत्रिक दोषामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यामुळे जल जीवन मिशन हर घर जल चा कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांनी तात्काळ याची दखल घेतली नाही तर नागरिकांच्या मोठ्या रोशाला प्रशासनास समोर जावं लागेल यात शंका नाही.