तिसरी घंटा… उत्सुकतेची… नव्या नांदीची…..!; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
प्रेक्षागृहात प्रेक्षक बसलेले आहेत. सर्वांना आतुरता आहे तिसऱ्या घंटेची आणि ती वेळ येते… तिसऱ्या घंटेचा आवाज येतो. नाटकातील सर्व कलाकार आणि पडद्यामागील सूत्रधार, नेपथ्यकार, वेशभूषा, केशभूषाकार मंचावर येऊन नांदी गायला सुरुवात करतात….!
‘नमननटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलधरा विवाह करूनी मदन जाळला मग मदनमित्र इंदू सेविला धन वैरागी द्यूत खेळला गौरीचा तो अंकित झाला।।’
मानापमान नाटकातील ही नांदी किंवा याच प्रकारच्या इतर वैशिष्ट्यपूर्ण नांदी म्हणजेच नाटकाला आरंभ करण्यापूर्वी केलेले ईशस्तवन तर कधी नाटकाचे सारांश रूप. खरेतर मराठी माणूस आणि नाट्यवेड हे फार पूर्वीपासून प्रचलित आहे. रंगमंचावर मानवी भावभावनांना जिवंत अभिनयातून साकार करणारे हे नाट्य कलाकार म्हणजे रसिकांचे जीव की प्राण… आणि म्हणूनच रंगमंचावरील तिसरी घंटा कायम उत्सुकता वाढवत असते.
सद्यस्थितीत मात्र आपल्या भारत देशात रंगमंचावरील नाट्याप्रमाणे एक खरेखुरे वास्तववादी नाट्य सुरू आहे, ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे ‘दर पाच वर्षांनी येतो निवडणुकीचा सोहळा.’ यंदा १९ एप्रिल २०२४ पासून सात टप्प्यात होणाऱ्या मतदानप्रक्रियेतील नुकतेच दोन टप्पे पार पडले. आता तिसरा टप्पा आहे ७ मे २०२४ या दिवशी. या टप्प्यात देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. सर्व सातही टप्प्यानंतर सुरू होणार पुढील ५ वर्षांसाठी सत्तेची तिसरी घंटा आणि नव्या कारभाराची नांदी….ही नांदी सुखदायी, यशदायी ठरावी…हीच आशा….
माननीय मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील यांनी ‘तिसरी घंटा’ हा विषय शनिवारीय काव्यस्पर्धेकरिता देऊन कवींना लेखणीतून व्यक्त होण्याची संधी दिली. बऱ्याच लेखण्या आयुष्याच्या रंगमंचावर अनिभिषिक्त बागडल्या, कुणी पर्यावरण समस्येला हात घालून धोक्याची तिसरी घंटा वाजल्या ची जाणीव करून दिली. तर काहींनी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अर्थात तिसऱ्या घंटेची आठवण करून दिली. पण तिसरी घंटा म्हटले की, आठवायला हवीच ती रंगभूमीवरील घंटा… किती आतुरता, किती उत्सुकता….कलाकारांचा जिवंत अभिनय कुठलीही पुनरावृत्ती ( Retakes ) न घेता प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात, कधी वेदनेच्या हुंदक्यात तर कधी हास्याच्या गडगडाटात दिलेली निरामय दाद म्हणजेच नाट्यकलाकारांना दिलेली खरीखुरी मानवंदना आणि तिसऱ्या घंटेची इतिकर्तव्यता… पुन्हा भेटू नव्या विषयासह… आगामी परीक्षणात….तोवर नमस्कार….🙏!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह