चीन पाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; रूग्णांची संख्या ४३१ पार
मुंबई: सर्व देशाला हादरून सोडणा-या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चीन पाठोपाठ राज्यातही कोरोना पाय पसरू पाहतो आहे. सोमवारी राज्यात करोनाचे ४३१ नवे रुग्ण आढळले असून शून्य मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८.०९ टक्के आहे. सोमवारी २९७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात ३१३१ रुग्ण उपचाराधीन आहेत. आजच्या रुग्णसंख्येसह राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७८ लाख ८६ हजार ३७५ झाली आहे. तसेच बरे होणाऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ७७ लाख ३५ हजार ३८५ अशी आहे.
*मुंबईत ३१८ नवे रुग्ण*
मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या ३०० च्या पुढे गेली असून सोमवारी ३१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. रुग्णांना लक्षणे नसली तरी रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढून दोन हजाराच्या पुढे गेली आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढू लागली आहे.
सोमवारी ३१८ नवीन रुग्ण आढळले, मात्र यातील ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. गेल्या काही दिवसात देनंदिन रुग्णसंख्या १५० ते २०० च्याही पुढे गेली आहे. सोमवारी आढळलेल्या ३१८ रुग्णांपैकी २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. दिवसभरात १५० रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली असून सध्या २,२३८ रुग्ण उपचाराधीन आहेत.करोनाचा धोका टळू लागलेला असताना पुन्हा एकदा मोठय़ा संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत.