संजय राऊत अजूनही अभ्यासात कच्चे…!
मुंबई: महाराष्ट्रात राजकीय सभेचा फड जिंकायचा म्हटला की आवेशपूर्ण विधाने करावी लागतात. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात हेच केले. पण तसे करताना त्यांच्याच अंगलट आले. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी महापालिकेवर भगवा फडकला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याच वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आमचं ठरलंय या विधानाचा संदर्भ घेऊन शिवसेनेला गृहीत धरल्याशिवाय कोल्हापूरचा महापौर होऊ देणार नाही, असा इशाराही दिला.
खरे तर गेली दशकभराहून अधिक काळ कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीचा महापौर होत असून त्याला शिवसेनेची साथ मिळाली आहे. तीही मातोश्रीच्या आशीर्वादाने! याचा राऊत यांना विसर पडला असावा. राऊत अजूनही अभ्यासात कच्चे असल्याचे दिसून आले. खेरीज ‘आमचं ठरलयं’ या विधानाचा समाचार घेताना त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लक्ष्य केले. पण याच काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलयं’ या घोषवाक्या मुळे शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा बाण विजयी लक्ष्यावर लागला होता. याचेही राऊत यांना विस्मरण झाले.
*राणांचा उतावीळपणा*
शिवसेना सरकारने अटक केल्यामुळे दिल्लीतील भाजप नेते आपले कौतुक करतील व ताकद देतील या आशेवर राणा दाम्पत्याने तुरुंगातून सुटल्यावर दिल्ली गाठली. राज्य सरकारकडून मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल दिल्लीत तक्रार करणार,असे जाहीर केले होते. दिल्लीत गेल्यावर राणा दाम्पत्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट मिळाली.
नंतर नेत्यांच्या भेटीसाठी राणा दाम्पत्य दिल्लीत ठाण मांडून बसले, पण रामदास आठवले वगळता कोणा मंत्र्यांची भेट मिळाली नाही. अमरावतीला परतल्यावर जंगी शक्तिप्रदर्शनाची तयारी झाली. पण त्यांनी केलेला उतावीळपणा त्यांच्या अंगलट आला. नियम मोडून केलेल्या शक्तिप्रदर्शनाबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राणा दाम्पत्य आता काय काय उद्योग करतात याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे.