राष्ट्रवादीची महापालिकांवर कब्जा करण्याची जय्यत तयारी
_अजित पवारांकडे पिंपरी तर आव्हाडांकडे ५ महापालिकांची जबाबदारी_
मुंबई : आगामी मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल मुंबई येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठीकीमध्ये पदाधिकारी आणि नेत्यांना महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर १४ महापालिकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेला वगळले आहे. मागील ३५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याकडे असल्याने मित्रपक्ष या नात्याने राष्ट्रवादीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत शरद पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत मंत्र्यांचे जनता दरबार लावून घेण्याच्या सुचना दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार याचा निर्णय नंतर होईल पण आता निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले गेले आहे. तसेच शिवसेना आणि काँग्रेस नेत्याबरोबर चर्चा करा आणि आघाडी करण्यात काय अडचणी आहेत याबाबतची माहिती जाणून घ्या, अशा सुचना शरद पवार यांनी उपस्थित सर्व मंत्र्यांना दिल्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. आमदार योग्य पद्धतीने मतदान करतील याची खबरदारी आणि मत वाया जाऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचनाही पवार यांनी मंत्र्यांना केली.
*महापालिका निवडणुकांच्या जबाबदारीचे मंत्र्यांना वाटप*
– अर्थमंत्री अजित पवार :
पुणे, पिंपरी चिंचवड
– गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
ठाणे
नवी मुंबई
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
उल्हासनगर
– खासदार प्रफुल्ल पटेल, नागपूर
– गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अमरावती
– ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर
– अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिक
– राज्यमंत्री दत्तामामा भरणे, सोलापूर