विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : स्वप्निल-आशीला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक
नवी दिल्ली – भारताच्या स्वप्निल कुसळे आणि आशी चौकसीने बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकाराच्या मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
स्वप्निल आणि आशी जोडीने युक्रेनच्या सेरहिय कुलिश आणि दारिआ तिकोव्हा जोडीला सुवर्णपदकाच्या लढतीत १६-१२ अशा फरकाने नमवले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी इलाव्हेनिल व्हलारिव्हान, श्रेया अग्रवाल आणि रमिता यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले होते. महाराष्ट्राच्या स्वप्निलचे विश्वचषक स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले. त्याने पुरुषांच्या रायफल थ्री-पोझिशन वैयक्तिक आणि सांघिक गटात रौप्यपदक मिळवले होते.
५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकाराच्या मिश्र सांघिक गटाच्या पात्रता फेरीमध्ये स्वप्निल-आशी जोडीने ९०० पैकी ८८१ गुणांची कमाई करत चौथ्या स्थानासह मानांकन फेरीसाठी पात्रता मिळवली. मानांकन फेरीत भारतीय जोडीने ६०० पैकी ५८३ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. युक्रेनची गुणसंख्याही इतकीच होती, मात्र फेरचाचणीत भारतीय जोडीला अव्वल स्थान मिळाले.
त्यानंतर अंतिम लढतीत युक्रेनच्या जोडीने पहिल्या चार फेऱ्यांच्या मालिकेत ६-२ अशी आघाडी घेतली. मात्र, पुढील आठपैकी सहा फेऱ्यांच्या मालिका जिंकत भारताने १४-१० अशी आघाडी मिळवली. युक्रेनच्या नेमबाजांनी आघाडी १२-१४ अशी कमी केली; पण त्यांना विजय मिळवता आला नाही. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात १६-१२ अशी बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
*पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानी*
भारतीय नेमबाजांनी या विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण पाच पदके जिंकली. त्यामुळे स्पर्धेअंती भारत पदकतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला. अग्रस्थानावरील कोरियाच्या खात्यावर तीन सुवर्ण आणि तीन कांस्य अशी एकूण सहा पदके होती.