वृध्दत्वात….कुटुंबाची साथ
सकाळच्या कामाच्या गडबडीत असतानाच मोबाईलची रींग वाजली.मी घाईतच नाव न बघता मोबाईल उचलला,”हॅलो! म्हणताच पलिकडून ओळखीचा वाटणारा वयस्कर आजींचा आवाज आला.हॅलौ, मी साळवी आजी बोलतेय..तू अर्चना बोलतेस का?..मी म्हटल हो आजी, बोला ना !. ” तुझ्याकडे वेळ असेल तर मला थोडं बोलायचय तुझ्याशी” त्या बोलल्या. खर तर मला अजीबात वेळ नव्हता पण त्यांना नाही म्हणायचं जीवावर आलं. “बोला ना आजी , अस म्हणून मी मोबाईल स्पिकर वर ठेवला व एकीकडे काम करायला लागले..आणि पुढचा अर्धा तास त्या माझ्याशी बोलत होत्या व मी नुसत ऐकत होते..खर तर त्या आजी म्हणजे एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व.
आजोबा गेल्यानंतर त्यांनीच मुलांच आई व बाबा बनून संगोपन केल होत. आता ऐंशीच्या पुढे वय आहे त्यांच पण आताशा त्या फारच घाबरायला लागल्या होत्या. एकटेपणाची पोकळी नकळत त्यांच्या मनात निर्माण होऊ लागली होती. आता आता पर्यंत आमच्या महिला मंडळातल्या सहली पासून ते सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणाऱ्या आजी आताशा या सगळ्यापासून दूर राहू लागल्या होत्या. आणि हा एकाकीपणा आता त्यांना त्रास देऊ लागला होता. मला फोन करुन अर्धातास बोलल्यावर त्यांना थोड मोकळं वाटू लागलं. फोन ठेवताना मला म्हणाल्या “अर्चना , तुझा खूप वेळ घेतला गं मी.पण तुझ्याशी बोलले आणि मन हलकं झालं माझं.” मी त्यांना म्हटल ‘अहो आजी, तुम्हाला जेव्हा वाटेल तेंव्हा तुम्ही मला फोन करु शकता” धन्यवाद म्हणून त्यांनी फोन कट केला. पण त्यांच्या बोलण्याने माझ्या डोक्याचं विचारचक्र मात्र सुरु झाल होत. त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होत की त्यांना सल्ले देणाऱ्यांची नाही तर त्यांच म्हणण कुणीतरी ऐकून घेणाऱ्यांची गरज होती. घरच्यांनी त्यांच्या काळजी पोटी त्यांच बाहेर जाण बंद केल होत. घरा मधे सुन ,मुलगा दोघेही नोकरी करणारे आणि नातवंड कॉलेज मधे जाणारी प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त. त्यामुळे त्यांच्याशी फक्त कामापुरतच बोलण व्हायचं. त्यामुळे त्यांनी यावर एक मार्ग शोधला तो म्हणजे नातेवाईकांना फोन करुन त्यांच्याशी गप्पा मारणे.सुरवातीला सगळे आनंदाने बोलत होते त्यांच्याशी पण नंतर नंतर सगळे त्यांचा फोन घेण टाळू लागले काहींनी तर वय झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असल्याचाही शिक्कामोर्तब केला.
या गोष्टी जेव्हा त्यांच्या कानावर गेल्या तेंव्हा त्या दुखावल्या गेल्या आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींपासून दूर रहाण्याचा विचार केला परंतू त्याचा त्यांना मानसिक त्रास होऊ लागला. एके काळी हेड नर्स असणाऱ्या आजींनी कितीतरी ऋग्णांना मानसिक आधार दिला होता आणि आज त्यांनाच मानसिक आधाराची गरज होती.त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी बोलण्याची गरज होती. मला मान्य आहे की आजकालच्या जीवनशैलीत प्रत्येक जण व्यस्त आहे पण तरीही आपल्या घरातील वडिलधाऱ्या माणसांसाठी थोडा वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधण्याचीही तितकीच गरज आहे. आणि मला वाटत घरातील प्रत्येक सदस्याने ही जबाबदारी ओळखून घरातील वडीलधाऱ्या माणसांसाठी थोडा वेळ दिला तर त्यांच्या मनात निर्माण होणारी एकाकी पणाची भावना नाहीशी होऊन त्याच्या मनात ते एकटे नाहीत तर पूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत आहे हा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो.
अर्चना सरोदे
सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव