उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली, पृथ्वीराज चव्हाणांची थेट टीका
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह न करता सभागृहात येऊन बोलले पाहिजे होते. त्यांनी लढण्याची ताकदच ठेवली नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, तो संभ्रम अवस्थेत आहे.पक्षांतर बंदी कायदा, बहुमत चाचणी याबद्दल न्यायालयाने स्पष्ट असा निकाल दिला नाही. मुळात उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनामध्ये यायला पाहिजे होते. त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती. अधिवेशनात भाषण करून राजीनामा दिला असता तरी चालले असते. पण त्यांनी अधिवेशनात संधी गमावली आहे. सभागृहामध्ये महाविकास आघाडी सरकार का स्थापन झाले याबद्दल बोलताही आले असते. विरोधी पक्षालाही बोलता आले असते. पण उद्धव ठाकरे यांनी लढण्याची ताकदच ठेवली नाही.