“ममाज बॉय”…आजच्या पिढीचा समज की गैरसमज
अर्चना सरोदे
सिलवासा, दादरा नगर हवेली आणि दमण व दिव
मागील अंकात आपण माझ्या नविनच लग्न झालेल्या विद्यार्थिनीने तिच्या नवऱ्याचा “ममाज बॉय” म्हणून उल्लेख केला होता हे वाचलं. खर तर या प्रसंगावरूनच मला या विषयावर बरेच दिवसांपासून लिहावस वाटत होतं.असो.. तर मुद्दा असा आहे की, आजच्या पिढीच्या मनात “ममाज बॉय ” विषयी वेगळीच व्याख्या तयार झालीय अथवा त्यांनी करुन घेतली आहे.(अर्थात हे सगळ्यांसाठी लागू होत नाही..ज्यांनी आपल्या मनात हा न्युनगंड करुन घेतला आहे फक्त त्यांना समजवण्याचा हा खटाटोप) बऱ्याच जणींना वाटतं की, आपला नवरा आईची उगीच काळजी करतो, ती जेवली की नाही , तीने औषधं घेतल की नाही, ती नेहमी रुटीन चेकअप करते का ? वगैरे वगैरे. आणि त्यात जर त्या मुलाला काही कामांमध्ये आई मदत करत असेल , त्याच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष करत असेल तर मग तो त्यांच्या दृष्टीने “ममाज बॉय” असतो. आणि मला वाटतं हा जो समज आहे तोच मूळी गैर (गैरसमज)आहे.
आपण नेहमीच बघतो की, मुलांचा कल वडिलांपेक्षा आईकडे जास्त असतो आणि मुलींचा कल आईपेक्षा वडिलांकडे जास्त असतो. त्यामुळे मुलगा जर आईची काळजी थोडी जास्त घेत असेल; तर त्यात वावगं असं काहीच नाही. उलट त्यातून त्याचे त्याच्यावर झालेले चांगले संस्कार दिसून येतात. हा आता असेल तो थोडा लाडावलेला, असतील त्याला काही चुकीच्या सवयी , जस की स्वत:चे कपडे घड्या करुन न ठेवणे, ओला टॉवेल वाळत न घालणे, एखादी भाजी आईच्या हातचीच आवडणे, ईत्यादी. परंतू यावरुन त्याला “ममाज बॉय” ठरवण किंवा तसा निष्कर्ष काढण चुकीचे आहे.आईवडिलांची काळजी घेण , त्यांची सेवा करण हेच तर आपले संस्कार आहेत , हीच आपली संस्कृती आहे. पुराणातल्या श्रावणबाळ आणि भक्त पुंडलिकाच्या गोष्टी आठवतात ना !
एकाने आई वडिलांची सेवा करता करता प्राण सोडले तर दुसऱ्याने आई वडिलांची सेवा करत असताना विठ्ठलाला ही विटेवर ऊभे केल. कितीही मोठे झालो तरी आईवडीलांना उलट उत्तर न करता त्यांच्या वयाचा मान ठेवण, त्यांचा आदर करण , त्यांची काळजी घेण अशी आपल्या देशाची संस्कृती असताना आईची काळजी करणाऱ्या मुलाला “ममाज बॉय” ही उपाधी देण कितपत योग्य आहे? याचा विचार आजच्या पिढीने केला पाहिजे. आईवर प्रेम असणारा, तीची काळजी घेणारा मुलगा व आई वरच्या प्रेमापोटी त्याचा अतिरेक करणारा मुलगा यात बरीच तफावत आहे.आणी तीच समजून घेण गरजेच आहे.
आईवर प्रेम सर्वांचच असतंसआणि ते असायलाच हव. परंतु ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटं सारखी नसतात त्याच प्रमाणे सगळी मुलं सारखी नसतात. काही मुल आईवेडी म्हणजेच आजच्या पिढीच्या शब्दात सांगायच झाल तर “ममाज बॉय” असतात ती थोडी अपरिपक्व असतात किंवा आईने इतकं लाडावलं असतं, की ती मोठी होतच नाहीत.
ती मुल स्वत:चा निर्णय स्वत: घेऊ शकत नाही.प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी त्यांना आई हवी असतें.आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा आईला विचारल्या शिवाय करत नाहीत. आपल्या आयुष्यातल्या वैयक्तिक गोष्टी सुध्दा ते आईबरोबर बोलत असतात. आईच्या विरोधात कुणी बोललेल त्यांना सहन होत नाही त्या साठी ते समोरच्या व्यक्तिशी भांडायलाही तयार असतात. त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांनी कुठे फिरायला जायच इथपासूनचे निर्णय त्यांच्या आईला विचारुनच ते ठरवतात. या गोष्टींचा त्यांच्या जोडीदाराला खूप त्रास होतो. याचा अर्थ असा नाही की ही मुलं वाईट असतात.उलट बाकी मुलांच्या तुलनेत ही मुलं स्त्रियांचा खूप आदर करतात.
मला आजच्या पिढीला हेच सांगायच आहे की जेंव्हा छोट्या गोष्टींसाठी तुम्ही मुलांना जे “ममाज बॉय” च लेबल लावता तेंव्हा तुमचा जोडीदार खरच” ममाज बॉय ” आहे का? हे एकदा आपल्या मनाला विचारा. तुमच तुम्हाला नक्की कळेल. जस माझ्या विद्यार्थिनीला मी या सर्व गोष्टी समजावून सांगीतल्यावर तिची चूक तीला कळली आणि तिने आपली चूक सुधारली.
अर्चना सरोदे
सिलवासा, दादरा नगर हवेली आणि दमण व दिव