नैसर्गिक संकटाचे ‘हायकू’ रेखाटन
✍️तारका रूखमोडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
संपूर्ण सृष्टीला वैभवाचं अपूर्ण लेणं बहाल करणारं निसर्ग बदलाचं मोहक रूप मनाला सुखावणारं असतं..तर कधी त्याच्या लहरीपणामुळे बदलणारं विनाशकारी स्वरूप डोळ्यातून दुःखाच्या जलधाराही प्रवाहित करणारं असतं.. माणसाला साथ देणारा निसर्ग मित्र अचानक संतप्त व संहारक बनला, तर माणूस त्यात सबाह्य होरपळून निघतो. अस्मानी कहराने चराचर सृष्टीचा व मानवी संपत्तीच्या विनाश भयावह असतो.
साहले कष्ट
उभे करण्या घर
अस्मानी ज्वर
परीक्षणीय रचना वाचताना आ. हंसराज दादांची ही रचना मनाला स्पर्श करणारी वास्तवच. खरंच माणूस किती आशावादी असतो ना! ऊन, वादळ, वारं या साऱ्यांची झळ सोसून काबाडकष्टाने तिनका तिनका जोडून घर उभारणीचं स्वप्न बघतो. उभं आयुष्य त्यात त्याला यात खर्ची घालावं लागतं, तेव्हा कुठे प्रेम ममतेचं घर उभारले जातं.हे घर म्हणजे केवळ निवारा नसतो तर जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं. त्यात हक्काचं भावनिक नातं असतं. सर्वाधिक सुख समाधान देणारा प्रेमाचा संसारथाट असतो.
पण अस्मानी संकटाच्या नियतीपुढे आपलं काहीच चालत नाही. अस्मानी संकट नैसर्गिक रौद्ररूपात अचानक येतो व सर्व बेचिराख करतो. निसर्गाच्या या उग्र भयानक संहारापुढे माणसाचे कर्तृत्व कवडीमोल ठरते. या भयंकर विध्वंसात सर्व स्वप्न बेचिराख होतात. त्यात उभारलेलं चिमणं विश्व कोलमडतं. केलेले सर्व कष्ट मातीमोल होताना बघून मनाचा कोपरा न कोपरा उध्वस्त व्हायला लागतो. स्वप्नांच्या ढिगार्यात उध्वस्त झालेल्या असह्य वेदना उरात घेऊन नैसर्गिक संकटापुढे तो हतबल होऊन कोसळलेल्या त्या निसर्ग कोपाकडे डोळ्यात अश्रूंचा पूर घेऊन निराशेने बघत राहतो.
हल्ली.. वादळी वाऱ्यासह सुरू असणारा पाऊस व त्यात होणारी मानवाची अपरिमित हानी ही सद्यस्थिती नेमकी हेरून कविवर्यांना यावर लिहिते करण्यासाठी व प्रतिभेच्या संवेदनेची उंची गाठण्यासाठी, त्यातले अचूक क्षण टिपण्यात शब्दप्रभू यशस्वी झालेतही.. असेच सुंदर लिहिते व्हा. काव्यशलाका फुलवत रहा व हायकू काव्यप्रतिभेला विशिष्ट उंचीवर नेण्याचा प्रयत्न करा.
तारका रूखमोडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
कवयित्री/ लेखिका/ परीक्षक/ संकलक