जन्म एकादशीचा
✍️अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा..
कर कटावरी ठेवून संगे रुखुमाई वाढविते शोभा
कासे पितांबर गळ्यात तुळशीचा हार.
विठ्ठल रुखुमाई अवघ्या विश्वाचे तारणहार
एकादशी… या एकादशीचा जन्म कसा झाला? तर
भारतात फार प्राचीन काळी देव आणि राक्षस यांच्यात नेहमी युद्ध होत असे. देवाधिदेव महादेव, शंकर हा सर्वात भोळा देव. राक्षसांनी त्यांचा स्वभाव ओळखला होता. म्हणूनच ते शंकराची तपस्या करायचे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचे. त्यांच्याकडून असा काही वर मागून घ्यायचे की ज्याच्यामुळे तर सर्वांना त्रास होईल. समस्या निर्माण होतील. कुंभ राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने पण अशाच पद्धतीने शंकराची उपासना केली. त्यांना प्रसन्न करून, अमर होण्याचा वर प्राप्त करून घेतला व तो देवांना पण अजिंक्य ठरला.
देवांना आणि मानवांना छळू लागला. देवांची त्याने दाणादाण उडवून दिली. सगळे देव घाबरले आणि त्रिकूट पर्वताच्या एका गुहेत लपून बसले. बाहेर सारखा धो धो पाऊस पडत होता. देव मृदुमान्य राक्षसाच्या भयाने अस्वस्थ झाले होते. मृदुमान्य राक्षस त्या गुहेच्या दाराशी देवांना मारण्यासाठी टपून बसला होता. गुहेत अडकून पडलेल्या सर्व देवांचे श्वास एकवटले आणि त्यांच्या त्या श्वासातुन एक दिव्य शक्ती निर्माण झाली. देवांनी तिची आराधना करत तिला त्या राक्षसांना ठार मारण्याची आज्ञा केली. तिने त्या राक्षसाला ठार मारले. त्या दिव्य शक्तीचे नाव देवांनी एकादशी असे ठेवले. त्या दिवशी सर्व देवांना उपवास घडला होता. हाच एकादशीचा उपवास. प्रत्येक कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी म्हणून प्रचलित झाली. एकादशीचा उपवास केल्याने आरोग्य प्राप्त होते असं म्हटलं जातं. असा हा एकादशी जन्माचा महिमा…!!
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर