वापी, नवसारी, वलसाड पाण्याखाली; गुजरातमध्ये पावसाचा कहर सुरूच
वलसाड: देशात संपूर्ण शहरे जलमय झाले असून, गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गुजरातमध्ये कहर केला आहे. राज्यात अजूनही पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत पावसामुळे नवसारी जिल्ह्यातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले. वापीसह, दादरा नगर हवेली, सिलवासा, दीव व दमण भागही प्रभावीत झाले असून, जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, बडोदा जिल्ह्यात आज पहाटे अडकलेल्या ४५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. हवामान खात्याने सौराष्ट्रसह गुजतरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण गुजरातेतील नवसारी जिल्ह्यातील वांसदा तालुक्यात आज सकाळी साडे आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सुमारे ३९४ मि.मी.पावसाची नोंद झाली.
वलसाड जिल्ह्यातील कापराडा आणि धरमपूर तालुक्यात अनुक्रमे ३७७ मि.मी.आणि ३४० मि.मी.पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे पूर्णा आणि अंबिका नद्यांची पातळी वाढल्याने नवसारी, बिलमोरा शहरांतील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले. नवसारीचे जिल्हाधिकारी अमित यादव यांनी पाणी साचल्यामुळे अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील चिखली ते वलसाड दरम्यानचा मार्ग टाळण्याच्या सूचना प्रवाशांना दिल्या. तापी जिल्ह्याल डोलवान तालुक्यात अग्निशमन दलाने पुरात अडकलेल्या १० जणांची सुटका केली. त्याचप्रमाणे, ‘एनडीआरएफ’च्या पथकाने बडोदा जिल्ह्यातील कांडारी गावात १८ मुलांसह ३५ जणांची सुटका केली.