गणेश उत्सवानिमित्त वाहनांना महाराष्ट्रात टोल माफी जाहीर करावी
_अखिल भा. ग्राहक पंचायत ची मागणी_
नागपूर: अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतचे सहसचिव अनिरुद्ध गुप्ते यांच्या वतीने सरकारला मागणी करीत आहे की, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेशी भेदभावपूर्ण वागणूक करणारा निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारने आमच्याही महाराष्ट्रतील येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनांना टोल माफी जाहीर करावी.
गणपती महाराष्ट्राचे आवडते दैवत आहे. गणेशोत्सव हा सण संपुर्ण महाराष्ट्रात अत्यंत भक्तीभावाने व पूर्ण उत्साहाने साजरा करण्यात येतो. विदर्भ व मराठवाड्यातील अनेक भाविक ह्या सणाकरिता प्रवास करून आपापल्या गावी पोहोचतात. तसेच गणेश चतुर्थी नंतर येणाऱ्या महालक्ष्मी किंवा गौरी हा सण देखील सगळीकडे विशेषता विदर्भात अत्यंत भक्तीभावाने साजरा केला जातो. त्याकरिता राज्यातील इतर भागाबरोबरच मध्य प्रदेश व छत्तीसगड सारख्या शेजारी राज्यांतूनही अनेक भाविक भक्त प्रवास करून आपापल्या गावी जातात.
जसा कोकणात निर्णय घेतला तसाच महाराष्ट्रात देखील निर्णय घेण्यात यावा. आणि तसेच राज्यातील गणेश भक्तांना कोकणा प्रमाणेच दिलासा द्यावा. आणि महाराष्ट्रातील गणेश उत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्रात टोल माफी जाहीर करावी. हीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मागणी आहे. असे एका पत्रकाद्वारे सहसचिव अनिरुद्ध गुप्ते यांनी म्हटले आहे. यावेळी नारायण मेहेरे, डॉ.अजय गाडे, संजय धर्माधिकारी, गजानन पांडे, ह्या सर्वांनी मागणी केली आहे.