नागपूरकर अतुलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
युवा मंचमधील माझ्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी अतुल एक वेगळा सखा. युवा मंच मधील वाढीत यशवंत गजभिये याचा वैचारिक वाटा मोठा होता. साधारण दिसणार्या या पोरात प्रचंड वैचारिक डायमेंशन्स होते. दुसर्या वर्षी तो म्हणाला की, सर आपण आपल्या युवा मंच मध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमाचे कॉलेजेसही घेतले पाहिजे. मग आम्ही वाना डोंगरीला माझ्या सायकलवर डबल पायडल मारत गेलो. तिथे वायसीसीला अतुल भेटला…
इंजिनियरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये एक किलर डॉमिनेशन तयार झालेले असते. इतरांना ते तुच्छ समजतात. (आता इंजिनियर्सही बेरोजगार राहू लागल्याने तो प्रकार कमी झाला.) तसलाच प्रकार अतुलच्या बाबतही होता. तरीही मातीशी जुळला असल्याने अन् मराठी वाचन असल्याने अतुल जोडला गेला. अर्ज करून तो महाविद्यालय प्रतिनिधी झाला. तरीही सुरुवातला बैठकांना तो यायचा तेव्हा, “क्या है ये फालतूगिरी ये तो देखेंगे!” या अॅटीट्युड मध्ये असायचा; पण दुसर्यांना समान पातळीवरचे समजत समजून घेण्याचा मातीतला गुण त्याच्यात होता. तो लवकर रुळला. बारीक निरीक्षण करून मग मत देणे, आपल्यावर आलेली जबाबदारी नीट पार पाडणे अन् एकदा त्याच्या परीक्षेत एखादी गोष्ट/ व्यक्ती उतरली की मग त्याचा विनाअट स्वीकार करणे, हा त्याचा उपजत स्वभाव होता. आपली माती, माणसं अन् आपले गावाकडची संस्कृती नव्या जगालाही कळली पाहिजे अन् ती श्रेष्ठ आहे, ही त्याची भावना आहे. म्हणून त्याची बोलभाषा नेहमीच वर्हाडी राहिली आहे.
अतुल टेक्नोसॅव्ही होता.
तेस्वाभाविकही होते. युवा मंचच्या वाढीत तंत्राचा उपयोग त्याच्यामुळे झाला. लेखकाला हवी असते ती व्यंगदृष्टी त्याच्याकडे आहे. म्हणून मी त्याला एक कॉलम लिहायला लावला अन् तो तरुणाईत त्यावेळी बर्यापैकी प्रिय झाला होता. अतुल, प्रशांत चक्करवार (तो एमबीबीएसला होता) यांच्यासारख्यांमुळे युवा मंचला एक वेगळी उंची म्हणा, झळाळी म्हणा आली.
अतुल विचारनिष्ठही आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याचीही त्याची तयारी असते. नोकरीत त्याने ती दाखविली आहे. युवा मंचच्या प्रत्येकच माझ्या सहकार्याने आपले वेगळेपण त्यांच्या कार्यक्षेत्रात ठसविले आहे. अतुलचा सार्वजनिक जीवनातील वावर तसा स्मार्ट आहे. अजूनही ते किलर इंस्टींक्ट त्याच्यात आहे. त्याने येत्या काळात अभ्यासपूर्ण असे काही लिहावे, खूप वाचन करावे, या शुभेच्छा!
– श्याम पेठकर