2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या देशभरातील कार्यक्रमाचं कौतुक केले. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणि युवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृत धारा बरसत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल.
आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे. आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना, भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे. आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ वाढण्यात यावेत. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे. तृणधान्याचा हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्याविषयी जागरूकता वाढवायची आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.