मनसे भाजपाची सोयरीक; राज ठाकरेंची हाताची घडी तोंडावर बोट
_भाजप मनसे युतीबाबत जयंत पाटलाची भविष्यवाणी_
मुंबई: सत्तासंघर्षानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक सुमारे तासभर चालली होती. सावध पवित्रा घेत गुपचूप मनसे भाजपाने सोयरीक उरकल्याच्या चर्चेला उधाण आले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत सध्यातरी हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवले आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत भविष्यवाणी केली आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, भाजप मनसे युतीची चर्चा रंगली आहे. शिवाय त्या दृष्टीकोनातून हालचालीही सुरु आहेत. मात्र, हे दोन पक्ष एकत्र आले तर हिंदी भाषिकांच्या मतांचा प्रश्न उपस्थित होईल अशी एक भीती भाजपामध्ये आहे. तर दुसरीकडे मराठी मतदार हे उद्धव ठाकरेंबरोबर असल्याने त्यांचा वेगळा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मनसे आणि भाजपा ही युती होण्यापूर्वी अनेक बाबींवर अभ्यास केला जाईल. पण हे एकत्र येतील की नाही याबाबतही अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या निर्णयाबाबत आपण बोलणे उचित नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी शिवसेना आणि भाजपात हिंदूत्ववादी मतांची दुफळी निर्माण होते म्हणूनच भाजपाने हा डाव साधला आहे. त्यामुळे त्यांना हिंदूत्वाशी घेणे-देणे नाहीतर मतांच्या गोळाबेरजेसाठी केलेला कयास असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. शिवाय भाजपाचे हिंदूत्व हे बेगडी आहे. एक दिवस ते सर्वांसमोर येईलच असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.