पिओकेमधील चीनने बांधलेला पूल कोसळला
नवी दिल्ली: पीओकेमधील हुंजा जिल्ह्यात चीनने बांधलेला ऐतिहासिक पूल पाहता-पाहता कोसळला आणि हिमनदीत वाहून गेला. पाकिस्तानच्या हवामान मंत्र्यांचं म्हणणं आहे की, वाढलेल्या उष्णतेमुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. यामुळे हे घडलं आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात चीनने बांधलेला पूल हिमनदीच्या वेगवान प्रवाहाचा आणि पुराचा सामना करू शकला नाही आणि कोसळला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे शिश्पर हिमनदी झपाट्यानं वितळत असून ती दुथडी भरून वाहत आहे. हा पूल काराकोरम महामार्गावर बांधण्यात आला होता.
पूल अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि पाण्यात वाहून गेला.
पाकिस्तानच्या मंत्री शेरी रहमान यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, हवामान बदल मंत्रालयाने याबाबत आधीच इशारा दिला होता. शिश्पर ग्लेशियरच्या (हिमनदी) जोरदार प्रवाहामुळे, पुलाच्या खांबाखाली जमिनीची धूप सुरू झाली, ज्यामुळे पूल कोसळला. 48 तासांत येथे पुन्हा तात्पुरता पूल बांधला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
*PoK चा हा पूल का खास होता?*
हा पूल पाकिस्तानसाठी खास होता. कारण, या पुलाला पीओके ते चीन काराकोरम व्हॅलीमार्गे जाणारा रस्ता जोडला गेला होता. दरी आणि उंच रस्त्यांमुळे हा पूलही आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जात होता. हा पूल चीनने बांधला होता. या भागात तीव्र उष्णता आणि हिमनद्या वितळण्याची समस्या अनेक वर्षांपासून आहे.
हा पूल चीन आणि पाकिस्तानला जोडणारा मुख्य पूल आहे आणि चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. वृत्तानुसार, ग्लेशियरच्या पुरामुळे केवळ पूलच नाही तर, घरंही पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे शेतजमीन, शेकडो कालवे, झाडे, पाणीपुरवठा वाहिन्या आणि दोन जलविद्युत प्रकल्पांचंही नुकसान झालं आहे.
*हजारो पर्यटक अडकले*
या दुर्घटनेमुळे पुलाच्या दोन्ही बाजूला हजारो पर्यटक अडकले असल्याचं वृत्त आहे. हिमनदीला पूर येण्याची घटना शनिवारची आहे.
*PoK मधील 33 हिमनद्यांचे तलाव कधीही फुटू शकतात: एजन्सी*
पाकिस्तानी एजन्सीनुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. ते म्हणतात की, गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर पख्तुनखा प्रदेशातील हिमनद्या वितळल्याने 3,000 हून अधिक हिमनद्यांचे तलाव तयार झाले आहेत. त्यापैकी 33 कधीही फुटू शकतात आणि पूर येऊ शकतो. पाकिस्तानच्या पर्यावरण मंत्री शेरी रहमान यांनी जागतिक नेत्यांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे. सध्या जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळण्याचं आणि दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळं जगभरातील समुद्र आणि महारसागरांची पातळी एका सेंटीमीटरने जरी वाढली तरी जगातला बराच भूभाग पाण्याखाली जाण्याची भीती शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.