आम्ही साहित्यवारीचे प्रवासी; सुधा मेश्राम
मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूर तर्फे राज्यस्तरीय कविसंमेलन लातूर शहरी ३ नोव्हेंबर ठरले. तेव्हापासून आम्हा अर्जुनी वासीतील कवीनी एकमेकांस फोनवरून विचारविनिमय करून जाण्याची तयारी दर्शवली. ट्रेनचे रिझर्व्हेशन करण्यासाठी एक दिवस ठरविला आणि नागपूर कोल्हापूर ट्रेनचे रिझर्व्हेशन केले. कविसंमेलनाला एक सव्वा महिना बाकी होता, तरी पण आमचे तिकिट हे वेटींग वर होते. कारण दिवाळीच्या सुट्ट्यामुळे जो तो आपल्या गावाकडे… किंवा कुटुंब सवे सहल… त्यामुळे प्रवासांची सर्वत्र रेलचेल असते. या कार्यक्रमाला अवधी खुप असल्याने वाटलं कि सिटही तोपर्यंत मिळून जाईल. लातूरचे हे डोहाळे लागले होते त्यामुळे दिवस कसे भराभरा निघून जात होते हे कळतच नव्हते.
ऐन दिपवालीच्या चार दिवसांपूर्वीच अचानक आईच्या मणक्यात आणि कंबरेत तीव्र वेदना सुरू झाल्या. माझा मुलगा म्हणाला आईची नाडी तपासली तर नाडी खुप जोरात चालत आहे; तेव्हा तर मी घाबरली पण लगेच स्वतः ला सावरून आईला याबाबतीत कळू द्यायचे नाही असे ठरवले. कारण माझी आई लवकरच घाबरते. माझा मुलगा नमित होता म्हणून मला थोडी हिंमत होती. काहीही होणार नाही अशी मी मुलाला म्हणायची. काहीही न झाल्यासारखे आपण आईच्या समोर वावरायचं तिला काहीच कळू द्यायचं नाही, म्हणून मी आणि नमित आईसोबत बोलत होतो, जेणेकरून तिचे लक्ष आजाराकडे जाणार नाही. पण आईच्या ह्या वेदना वाढतच होत्या. लगेच गाडी बोलावून दवाखान्यात नेलं आणि ट्रिटमेंट सुरू झाली, तेव्हा कुठे जिवात जीव आला . तेथे कळलं कि मणक्यांच्या एका बरगडीत थोडी वाक आहे त्यामुळे आईला एक ते दोन महिन्याचे बेडरेस्ट सांगितले.
लातूरची तयारी ही रद्द करावी असं ठरवलं होतं. पण मुलाने तोपर्यंत आईला बरं होईल आणि खरचं आईच्या तब्येतीत थोडी थोडी सुधारणा होऊ लागली. जसं जसं दिवस जवळ येऊ लागले तसं तसं आईची काळजी वाटत होती. पण मुलाने म्हटलं कि रिझर्व्हेशन रद्द नको करू तू निश्चिंत जा असे बोलला आणि शेवटी जाण्याची तयारी केली.
अशीच एक घटना आमच्या सोबत अमरावतीहून येणा-या सुलोचना लडवे ताईसोबत घडली त्यांच्या मामाजीची तब्येत गंभीर असल्याने त्यांचे रिझर्व्हेशन रद्द करावे लागले. म्हणूनच वेळेवर कोणता आणि कसा प्रसंग ओढवेल याची शाश्वती नाही. शेवटी लातूरला जाण्याचा दिवस उगवला सकाळच्या नऊ वाजताच्या बसने अर्जुनीहून जाण्याचे ठरले होते. सर्व सामानाची आवराआवर करून मुलाला एकच सांगत होती कि आईची काळजी घे…तो म्हणायचा कि मी आहे ना… तू मात्र निश्चित रहा… काळजी करू नको. प्रवासाचा आंनद घे म्हणून मला बसस्थानकापर्यंत सोडायला आला आणि तेथूनच तारकाताईसोबत पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो…!!
(क्रमश:)
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह