“महात्मा फुले हे आदिवासी कवितेचे पहिले उद् गाते”; विश्वास वसेकर
_महात्मा फुले यांच्या स्मृतीनिमित्त काव्यसंमेलन_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: ” महात्मा फुले हे पहिले आधुनिक मराठी कवी , तर सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या आधुनिक मराठी कवयित्री असून आजच्या मराठी कवितेत महत्त्वाच्या असलेल्या आदिवासी कवितेचे देखिल महात्मा फुले हेच प्रथम उदगाते आहेत “, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विश्वास वसेकर यांनी पत्रकार भवन येथे महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित कविसंमेलनात बोलताताना केले. ‘महात्मा फुले अभिवादन कविसंमेलना ‘च्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद, अक्षरभारती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासन ह्या तीन संस्थांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि रामदास फुटाणे ह्यांच्या मातोश्री या दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कविसंमेलनाचे समन्वयक, ‘ अक्षरभारती ‘ चे विश्वस्त डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. महात्मा फुले समता परिषदेचे सदस्य रवी चौधरी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, तसेच कोशाध्यक्ष सौ.सुनीताराजे पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कविसंमेलनामध्ये प्रसिध्द कवी उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, सौ.मृणालिनी कानिटकर – जोशी , प्रसाद माधव कुलकर्णी (इचलकरंजी), धनंजय सोलनकर ( लोहगाव), बबन धुमाळ ( हडपसर), अनिल दीक्षित ( सांगवी), अभिजित काळे ( पिंपरी चिंचवड) ह्यांनी आपल्या
कविता सादर केल्या. रमेश बेंद्रे, सौ.वैशाली मोहिते, सौ.प्रज्ञा करडखेडकर – वसेकर अशा जाणकार रसिकांच्या उपस्थितीत झालेले कवीसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. ‘ अक्षरभारती ‘ चे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले ह्यांनी आभारप्रदर्शन केले , सूत्रसंचालन प्रा.रूपाली अवचरे यांनी केले.