स्त्री शिक्षण विषयक छत्रपती शाहू महाराजांची भूमिका
छत्रपती शाहूमहाराज हे19 व्या शतकातील द्रष्टे जागरूक, कर्ते समाज सुधारक होते. स्त्रीयांचा उद्धार शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही. शिक्षणविना तिला विद्याहीन, धनहीन आणि सत्ताहीन बहुजना प्रमाणेच वागवले जात होते. तिच्या काया, वाचा, मनावर गुलामगिरीने ताबा मिळवला होता. क्रांतीबा जोतिबा आणि सावित्रीमाई फुले यांच्या विचाराच्या कार्याच्या वाटेवर धर्ममार्तंडानीं पायमल्ली केली होती, त्यास वाहिवाट करण्याचा क्रांतिकारी निर्णय शाहू महाराजांनी घेतला. कारण, स्त्रीयांना अज्ञान अंधश्रद्धा आणि दुबळे पणात गुंतवून पराधिनता, लाचारीत जगायला मजबूर केले होते,हा दोष केवळ शिक्षणाने निघू शकतो. म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात महिलांनी शिक्षण घ्यावे यासाठी अनेक शाळा,रात्र शाळा,वसतिगृहाची स्थापना केली.महिलांनी शिक्षण घ्यावे, त्यांच्या समस्याचे निराकारण व्हावे,म्हणून ते सदैव काळजी घेत असत.त्यामुळे त्यांनी पहिल्या महिला शिक्षणाधिकारीचें,पद स्थापन करून अतिशय बुद्धिमान अशा रखमाबाई केळवकर यांची नियुक्ती केली. शाहुनी जागरूकपणे घेतलेला निर्णय त्या काळी मैलाचा दगड ठरला. यामुळे महिला, मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले.
महात्मा फुलेच्या नंतर शिक्षणाचा वटवृक्ष बहरावा यासाठी समानतेच्या कायद्याने एकाच वर्गात मुलामुलीनें
शिक्षण घ्यावे हा आग्रह धरला. यामुळे धीटपणा येऊन, विचाराचे आदान प्रदान होऊन बुद्धी वाढेल असें त्यांना वाटायचे, तसेंच विचार विश्व समृद्ध होऊन समाजाच्या कामी यावे असें वाटायचे.आणि काही ठिकाणी खास मुलींसाठी शाळा पण स्थापन केल्या.शिक्षक पुरस्कार जाहीर करून कार्य कृत्वाचा सन्मान केला. मुलींच्या उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणानुसार शिक्षकांसाठी इनाम (बक्षीस)योजना सुरु केली होती. म्हणजेच आताचा आदर्श शिक्षक पुरस्कार होय.
मुला मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून,मोफत शिष्यवृत्ती,योजना सुरु केली. शाहू महाराजांची कन्या अक्का साहेब यांच्या विवाहप्रित्यर्थ 40रु ची शिष्यवृत्ती चौथीच्या वर्गात सर्वाधिक गुण मिळवलेल्या मुलीला देण्याचा पायंडा घातला. आणि इतर 5 प्रकारच्या शिष्यवृत्ती प्रदान केल्या. आणि यांची नोंद 1919च्या गँझेट मध्ये कायम स्वरूपी केली. यातून त्याची शिक्षणाची तळमळ, उदार धोरण दिसून येते.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी कित्येक हुशार होतकरू मुलींना डॉक्टरकीचे शिक्षण परदेशी इंग्लंड,अमेरिका,येथे देवून मायदेशी आणले. त्यापैकी कृष्णाबाई यांनी एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूर. येथे रुग्ण सेवेसाठी आपले जीवन वाहिले. महिलाच्या शिक्षणाचा आग्रह धरून,तो पूर्णत्वास नेण्याचा यशस्वी प्रयन्त शाहूनी केला.रयतेवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या जगतवंदनुय छत्रपती शाहू मराजांना त्रिवार वंदन.
कवयित्री, लेखिका
मायादेवी गायकवाड
मानवत,परभणी