‘तशी आजही मी दुर्लक्षीतच’; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
आई ग…! ‘किती कुडकुडते मी….’ बाहेरून भिजून आली आणि पडली या अडगळीत. कुणाला वेळ आहे माझ्याकडे पहायला? पुन्हा काम लागेल तेव्हा शोधतील, पण असू दे आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. घराच्या या कोपऱ्यात मी आणि त्या कोपऱ्यात बहुतेक आजीबाई दिसत आहेत. जरा जाऊन बघते काय म्हणतात त्या…”आजीबाई चहाची वेळ झालीय ना तुमची?” पण ना कुणाला आठवण आहे, ना कुणाला वेळ, कोण बनवून देईल? सर्वच आपापल्या कामात. करतील आजी चहा त्यांच्या सवडीने, काळजी करू नका.? अहो, मी पाहत आहे गेल्या अनेक वर्षापासून तुमची ही मानवजात अशीच आहे. काम झालं की, दुर्लक्ष करायचं. यांना हे कुठं कळतं आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू फार मोलाची असते आणि तिची किंमत ती वेळ आल्यावरच कळते. काय म्हणतात? मला नाही ओळखलं? मी तुमच्या घरातली लहान, काळी ‘छत्रीताई…पटली ना आता ओळख’…??
ऊन असो वा वारा
घेई डोईवर जलधारा
वेदना किती जाहल्या
देई सा-यांना निवारा
पावसाळ्यात पावसापासून रक्षण करायचं आणि उन्हाळ्यात सूर्य दादाला अंगावर झेलत तुम्हाला सावली द्यायची. तसा माझा इतिहास खूप जुना 4000 वर्षापासून मानव माझा वापर करत आहे. सुरुवातीच्या काळात एका काठीला गोलाकार कमळाची पानं बांधून लोक त्याचा छत्री म्हणून वापर करत. काळ बदलला, तसे माझेही स्वरूपही बदलत गेले. माझा आकार बदलला, माझा रंग बदलला, माझं रूप बदललं. सर्व काही बदललं. पण तुमचं रक्षण करण्याचा माझा धर्म मात्र मी आजवर तसाच ठेवलेला आहे. फोल्डेबल छत्री, सॉलिड स्टिक छत्री, गोल्फ छत्री असे माझे भिन्न प्रकार आज सर्वच रंगात उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मी आवडते. एवढेच नव्हे तर चर्चमध्ये धार्मिक विधीत तर बौद्ध धर्मात आदराचे चिन्ह म्हणूनही मला स्थान देण्यात आलेले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर माझी सावली पडली आणि मी स्वतःला धन्य समजले. इतकच नाही, ‘राष्ट्रीय छत्री दिवस’ म्हणून 10 फेब्रुवारी हा दिवस सुद्धा साजरा केला जातो.
कुणी कसेही असो, कुणी माझ्यावर प्रेम करो की नको करो. पण, एक गोष्ट मात्र नक्की. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतील ‘पोपटलाल’ सारखा आपल्यावर प्रेम करणारा कुणीतरी आहे ही भावना मला मनोमन सुखावते. तशी नेहमीच दुर्लक्षित असणारी मी. का कुणास ठाऊक यावेळेस ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांच्या नजरेत आली आणि बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी त्यांनी मला माझी व्यथा मांडण्याची मुभा दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते.
सारस्वत मंडळीनो, चेतनेला शब्दबद्ध करणे तसं सोपं; पण अचेतन वस्तूत चेतना निर्माण करून त्याबद्दल काव्यत्व करणं तसं दिव्यत्व. तेव्हा तुमच्या दिव्यत्वाला सर्वप्रथम मानाचा मुजरा आणि आज यात तुम्ही सर्वजण यशस्वी झालात याचा मला सार्थ अभिमान आहे तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील लिखाणासाठी अनंत कोटी शुभेच्छा..,!!
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली, दिव दमण
मुख्य परीक्षक/ प्रशासक/ कवयित्री/ लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह