सावधान तरूणांनो…!! कंबोडियामध्ये नोकरीच्या अमिषाला बळी पडू नका
मोठी फसवणूक होण्याची शक्यता ; परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा
कंबोडीया: भारतीयांना डेटा एंट्री किंवा इतर सोप्या पण प्रचंड पगारांच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले जाते. पण कंबोडियात पोहोचल्यावर त्यांना धमकावले जाते आणि ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जाते.
_नक्की काय आहे प्रकरण_
या फसवणुकीत बनावट सोशल मीडिया खाती तयार करणे आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांची फसवणूक करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्याशिवाय, धक्कादायकबाब म्हणजे जर या लोकांनी टार्गेट पूर्ण केले नाही तर त्यांना उपाशी ठेवले जात होते. त्यांना खाण्या[ पिण्यासारख्या मूलभूत सुविधाही दिल्या जात नव्हत्या.
–किती भारतीय अडकले?_
कंबोडियामध्ये या सापळ्यात जवळपास 5,000 भारतीय अडकले आहेत. ओडिशाच्या राउरकेला पोलिसांनी डिसेंबर २०२३ मध्ये सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला तेव्हा फसवणूक उघड झाली. या टोळीतील ८ जणांना अटक करण्यात आली असून ते भारतीयांना कंबोडियात पाठवायचे.
_फक्त कंबोडियात अशा घटना घडतात?_
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात जाण्यासाठी असे बनावट नोकरीचे घोटाळे अनेक देशांत समोर आले आहेत. यामध्ये पूर्व युरोप, आखाती देश, मध्य आशियाई देश, इस्रायल, कॅनडा, म्यानमार आणि लाओस या देशांचा समावेश आहे.
_परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना सल्ला_
परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी कंपनीबाबत चौकशी करावी, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. अधिकृत एजंटांमार्फतच परदेशात जाण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही ज्या कंपनीत काम करणार आहात त्या कंपनीची संपूर्ण माहिती गोळा करा.