इतिहासात पहिल्यांदाच भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा
भिडेवाड्याचा मूळ इतिहास कवितांमधून हे ऐतिहासिक-डॉ. संदीप सांगळे
वसुधा नाईक, प्रतिनिधी
पुणे: भिडेवाड्याचा मूळ इतिहास पुढील पिढीसाठी कविता लेखनाच्या माध्यमातून जतन करून ठेवणे आवश्यक व महत्वाचे आहे आणि हे ऐतिहासिक कार्य भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी ‘ भिडेवाडा बोलला ‘ आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेच्या माध्यमातून केल्यामुळे भिडेवाडा काव्यलेखन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भिडेवाडाकर विजय वडवेराव यांची कविता अभ्यासक्रमात असायला हवी असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक कवीने देशातील मुलींच्या पहिल्या शाळेविषयी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आणि बघता बघता स्पर्धेचे स्वरूप राष्ट्रीय व नंतर आंतरराष्ट्रीय झाले. त्यामुळे निस्वार्थ, निरपेक्ष भावनेने काम केल्याशिवाय समाज कोणाच्याही पाठीशी खंबीरपणे उभा राहत नाही. अशी भावना डॉ.संदीप सांगळे यांनी व्यक्त केली. भिडेवाडाकार विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी म.भा चव्हाण,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक एम.डी.कदम तर अध्यक्षस्थानी कवी विजय वडवेराव होते. सोहळ्याला महाराष्ट्र,कर्नाटक ,गोवा, केरळ , गुजरात, सिलवासा येथिल साहित्यिक उपस्थीत होते अमेरिका,लंडन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, दुबई, अबुधाबीसह देश विदेशातील ६०० कविंनी आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
यावेळी प्रत्यक्ष भिडेवाडयात १३ जुलै २०१५ रोजी संपन्न झालेल्या एकमेव ऐतिहासिक भिडेवाडा कविसंमेलनात सहभागी कविंचा सन्मान कवी म.भा.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच भिडेवाडा मुक्ती चळवळीत योगदान असणाऱ्या दादासाहेब सोनवणे,अहिल्याबाई कांबळे यांचा मान्यवरांचा हस्ते सन्मान करण्यात आला.सूत्रसंचालन बेळगाव येथील शिक्षक कवयित्री स्नेहल पोटे व सूरत येथील शिक्षक कवयित्री मिनाक्षी जगताप यांनी केले
*आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा विजेते*
*प्रथम क्रमांक* – डॉ. कविता मुरूमकर( सोलापूर)
*द्वितीय क्रमांक* – डॉ. वैशाली शेंडगे सांगली
*तृतीय क्रमांक* – प्रा. माया मुळे धाराशिव
*उत्तेजनार्थ*
प्रभाकर दुर्गे. गडचिरोली
स्नेहल पोटे. बेळगाव
मिनाक्षी जगताप ,सूरत
मनिषा पाटील ,केरळ
अनुपमा नाईक ,गोवा
आनंद ढाले ,सिलवासा
धनश्री ठाकरे ,अमेरिका
आनंद भोसले, लंडन
क्षमा सावंत ,स्वीडन
मनोज भारशंकर,अबुधाबी
डॉ.स्नेहल कुलकर्णी ,कोल्हापूर
प्रणाली मराठे ,धुळे
वंदना केंद्रे लातूर
पल्लवी उमरे, मुंबई
वृषल चव्हाण, पुणे