मोदींचे हात मजबूत करण्यासाठी सुनील मेंढेंना पुन्हा एकदा निवडून द्या – योगी आदित्यनाथ
खा. मेंढेंच्या प्रचार सभेत प्रचंड जनसमुदाय
भंडारा: उत्तरप्रदेशात आज परिवर्तन आले आहे. राज्यात उपद्रव नाही तर उत्सव असतात. दंगा करणारे दंगे विसरले आहेत. हे परिवर्तन जात, धर्म, प्रांत, भाषा या आधारे नाही, तर कायद्याच्या आधारे आले आहे. आम्ही तुष्टीकरणाच्या नव्हे, तर लोकांच्या संतुष्टीच्या आधारावर बदल घडवून आणला. याचा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ, सबका विकास या सुत्रातून जातो. म्हणूनच आज विकसीत राष्ष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे. या कार्यात भंडारा-गोंदियाचा हातभार लागावा म्हणून सुनील मेंढे यांना दूस-यांदा लोकसभेत पाठवा, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
19 एप्रिल रोजी होत असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आज भंडारा येथील दसरा मैदानात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व्यासपीठावर आलेल्या योगींचे स्वागत उपस्थित हजारो नागरिकांनी जय श्रीराम च्या घोषणांनी झाले.
यावेळी व्यासपीठावर खा. प्रफुल्ल पटेल, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, माजी मंत्री परीणय फुके आ. नरेंद्र भोंडेकर, आ. विजय रहांगडाले, राष्ट्रवादीचे नेते धनंजय दलाल,ब्रम्हानंद करंजेकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने व महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना योगी आदित्यनाथ यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचे भावतंत्र पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचे सांगितले. संविधानाचे शिल्पकार या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली, तोच भाव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये दिसून येतो, असेही योगी म्हणाले. न थांबता, न थकता आणि न विकता सरकार चालवून दाखविले. आम्ही रामललाचे मंदिर बनविले, मात्र त्या आधी चार कोटी लोकांना घरे दिली. अनेक योजनांचा लाभ दिला, तो कोणत्याही जाती, क्षेत्र किंवा भाषेच्या आधारे नाही तर अंत्योदयाच्या मूलमंत्राच्या आधारे दिला. आमच्या देशात आमचे शासन असेल, कोणत्याही विदेशी व्यक्तीचे नाही, हीच शिवाजींची इच्छा होती आणि ती पुर्ण होत असल्याचेही योगी म्हणाले. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश विकसीत राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे. या कार्यात महाराष्ट्राचा आणि भंडारा-गोंदियाचा हातभार लागावा म्हणून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.यावेळी खा. प्रफुल्ल पटेल, उमेदवार सुनील मेंढे, जयदिप कवाडे यांची भाषणे झाली. 15 हजाराहून अधिक जनसमूदाय योगींना ऐकण्यासाठी उपस्थित होता.